आमदार भास्कर जाधव यांच्या रिफायनरी समर्थनानंतर कार्यकर्त्यांचा सवाल
वार्ताहर/ राजापूर
ज्या शिवसैनिकांच्या बळावर विनायक राऊत खासदार झाले, त्या शिवसैनिकांनी कोकण विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली असता खासदार राऊत यांनी त्यांना चपलेने झोडण्याचे आदेश दिले. आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून विकासाचा बाजूने कौल दिला आहे. आता खासदार राऊत यावर काय भूमिका घेणार असा सवाल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थन आणि विरोधावरून उठलेले वादळ लॉकडाऊनच्या काळात शांत होते. दरम्यान शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले. कोकणातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि कोकण विकासासाठी असे प्रदुषण विरहीत प्रकल्प कोकणात यावेत आणि सर्वांनी अशा प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही रिफायनरी प्रकल्पाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात असताना सेना आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केल्याने प्रकल्पाच्या बाजूने असलेल्या स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांना बळ मिळाले आहे. रिफायनरी प्रकल्पाला समर्थन आणि विरोध यावरून राजापूरातील शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण झाला होता. सागवे येथे झालेल्या मेळाव्यात खासदार राऊत यांनी समर्थन करणाऱया शिवसैनिकांना चपलेने मारण्याची भाषा केली होती. शिवाय रिफायनरीचे समर्थन केले म्हणून सागवे विभागातील सर्व शाखाप्रमुख तसेच विभाग प्रमुख राजा काजवे, जिल्हा परिषद सदस्या सौ.लक्ष्मी शिवलकर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली होती.
रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती सोबतच आपल्या भागाचा विकास होणार असल्याने सागवे विभागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा प्रकल्प हवा आहे, अशी मागणी करत खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन आपले म्हणणे पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्याची संधी द्या, अशी अनेकदा विनवणी केली. मात्र कार्यकर्त्यांची मते जाणून घेणे तर दूरच उलट ज्या कार्यकर्त्यांनी खासदार या पदापर्यंत पोहोचविले त्यांनाच चपलेने मारण्याचे आदेश विनायक राऊत यांनी दिले. स्थानिक जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा असताना प्रकल्पाला विरोध करण्यामागे खासदारांचा नेमका हेतू काय याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही, असे आंबेकर म्हणाले.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेऊन विकासाचा बाजूने कौल दिला आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना चपलेने झोडण्याची भाषा करणारे खासदार विनायक राऊत यावर काय भूमिका घेणार असा सवाल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. रिफायनरी समर्थनाची भूमिका घेणाऱया प्रत्येक शिवसैनिकावर कारवाई करून स्वतःच्या हाताने शिवसेना संपविणार का असा सवालही आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे.