गॅसवाहिनी घालण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत विकास झालेल्या रस्त्यांच्या दुतर्फा खोदाई : नागरिकांसमोर पुन्हा खड्डय़ांची निर्मिती
प्रतिनिधी /बेळगाव
विद्युतवाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली. तसेच डेनेज वाहिन्यांसाठी, जलवाहिन्यांसाठीही विविध रस्त्यांची खोदाई झाली. त्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून रस्ते सुस्थितीत करण्यात येत असतानाच आता टिळकवाडी परिसरात घरोघरी गॅस जोडण्या देण्यासाठी गॅसवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा खोदाई सत्र सुरू झाले असून वाहनधारक आणि नागरिकांसमोर पुन्हा नवे खड्डे निर्माण झाले आहेत.
संपूर्ण शहरात घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याची योजना राबविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामाची जबाबदारी मेघा गॅस कंपनीकडे सोपविण्यात आली असून विविध ठिकाणी गॅसवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी मुख्य गॅसवाहिन्या घालण्याचे काम हाती घेऊन काही उपनगरांमध्ये गॅसजोडणी करून देण्यात आली आहे. त्यानंतर आता टिळकवाडी, अनगोळ, भाग्यनगर परिसरात गॅसवाहिन्या घालण्याचे काम सुरू झाले आहे. टिळकवाडीत विविध भागात गॅसवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. तसेच रस्त्याशेजारी पेव्हर्स घालून संपूर्ण रस्ता सुसज्ज करण्यात आला आहे. पण आता गॅसवाहिन्या घालण्यासाठी या रस्त्यांची पुन्हा खोदाई सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी हेस्कॉमकडून भूमिगत विद्युतवाहिन्या घालण्यात आल्या. तसेच काही भागात डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. ही कामे करत असतानाच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध कामे सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक रस्ते सातत्याने बंद होते. ही कामे पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती अंतिम टप्प्यात होत असतानाच आता घरोघरी गॅसजोडणी देण्याच्या योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता खोदाई सत्र सुरू झाले आहे.
जलवाहिनी व गॅसवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. केवळ पेव्हर्स घालून रस्ते करण्यात आले होते. सदर पेव्हर्स काढून आता गॅसवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांची दुरवस्था होत आहे. ज्याठिकाणी गॅसवाहिन्या घालण्यात येत आहेत त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पण दुरुस्तीस विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात आल्यास शहरवासीय तसेच वाहनधारकांना कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. त्यादृष्टीने गॅस कंपनी आणि महापालिकेने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
वारंवार होणाऱया खोदाई सत्रामुळे नागरिकांना त्रास
यापूर्वी कोटीचा निधी खर्च करून रस्ते निर्माण करण्यात आले होते. पण आता गॅसवाहिन्या घालण्यासाठी दुतर्फा खोदाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी घालण्यात आलेले पेव्हर्स काढण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला असून निधीचा अपव्यय झाल्याची टीका नागरिक करीत आहेत. रस्ता करण्यापूर्वी गॅसवाहिन्या आणि जलवाहिन्या का घालण्यात आल्या नाहीत? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. प्रशासनाचे अयोग्य नियोजन आणि समन्वयाअभावी जनतेच्या पैशांची लूट होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. तसेच वारंवार करण्यात येणाऱया खोदाई सत्रामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.