मगो नेते सुदिन ढवळीकर यांचे आवाहन
वार्ताहर / मडकई
आप व तृणमूल काँग्रेसच्या नेत्याशी झालेल्या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. भाजपाशी युती म्हणजे आत्मघात करुन घेण्यासारखे आहे. मात्र गोव्याच्या राजकारणात निश्चीतच बदल घडेल. गोमंतकीय जनता हे परिवर्तन घडवून आणणार असून त्यासाठी आपण जनतेला हाक देत असल्याचे मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यात तृणमूल कॉग्रेस पक्षाने शिरकाव केलेला आहे व निवडणूकीसाठी तो सज्ज झालेला आहे. आपल्याला भेटण्याच्या तयारीत ममतादीदी असून लवकरच ही भेट होईल. तृणमूल पक्ष गोव्यात पैशांचा चुराडा करेल. पैशांची आमीशे दाखवून केलेले राजकारण फसवे असते. आमदार फोडाफोडातून आधिच भाजप व काँग्रेसने गलीच्छ राजकारण खालच्या पातळीवर आणले आहे. पक्षांतर करण्याऱया या नेत्यांचा आता उबग यायला लागलेला आहे, असे सांगताना आमदार सुदिन ढवळीकर यांनी तृणमुलमध्ये प्रवेश केलेले आमदार लुईझीन फालेरो यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षात प्रदीर्घ काळ घालविल्यानंतर सत्तराव्या वर्षी राजीनामा देऊन पक्षांतर करणे हे उचीत नाही. यावरून राजकारणाची पत कुठे पोहचेलेली आहे, हे सुजाण जनतेच्या लक्षात आले असेल. सत्तरी गाठलेल्या नेत्यांनी आता निवृत्ती स्विकारण्याची गरज असल्याचे मत ढवळीकर यांनी व्यक्त केले
गोव्यात सर्वांत आधी कॉग्रेस पक्षाने आमदार फोडाफोडीचे राजकारण केले. त्याचे परिणाम आज कॉग्रेस पक्ष भोगीत आहे. भाजपाने घाऊकरित्या आमदार फोडले. त्यांचे परिणाम आगामी निवडणुकीत भाजपाला भोगावे लागतील. भाजपाने राजकारणात एकदम खालची पातळी गाठली आहे. त्यात तृणमूल कॉग्रेसाच्या प्रवेशामुळे भाजपा आता कोंडीत सापडला. पुढील रणनिती मगो पक्ष येत्या तीन महिन्यात आखणार आहे. तळागाळातील सर्व कार्यकत्यानी संघटीत होऊन योग्य उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ढवळीकर यांनी केले.
काही पक्षांचे पडेल आमदार व खासदार रिकामटेकडे असल्याने बेताल वक्तक्ये करतात. मतदारांनी त्याकडे लक्ष देऊ नये. राजकारणात सुसूत्रता आणण्यासाठी मतदारांनी परिवर्तन घडवावे. येणाऱया विधानसभात नवीन इतिहास रचण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
तौक्ते वादळात नुकसान झालेल्या लोकांना सरकारची मदत अद्याप मिळालेली नाही. सरकारने रोटरी क्लबच्या माध्यमातून रु. 2 लाखांची मदत नुकसानग्रस्ताना देण्याची घोषणा केली होती. खांडेपार येथे घर मोडलेल्या एका कुटुंबाला केवळ रु. 95 हजार मिळाले आहेत. मगो पक्षाकडे त्यांनी संपर्क साधलेला असून त्यांना निश्चितच मदत केली जाईल. कोरोना काळात छोटे व्यावसायिक मेटाकुटीस आले असून त्यांना पाच हजारांचे अर्ज उपलब्ध केले आहेत. ही योजना म्हणजे ‘जुन्या बाटलीला नवीन गुट्टी’ असा हा प्रकार आहे. आपण समाजकल्याण मंत्री असताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व त्यानतंर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात ही योजना तयार करून फळ व फुलविक्रेत्यांना त्याचा लाभही मिळवून दिला होता. लाडली लक्ष्मी, ज्येष्ठ नागरिक व गृहआधार योजना पैशांअभावी अडकून पडलेल्या असताना सरकार व्यावसायिकांना पाच हजार कोठून देणार. निवडणूक डोळय़ासमोर ठेवून ही योजना म्हणजे केवळ स्टंट आहे, असे ढवळीकर म्हणाले.