जिल्हा भूमीअभिलेख विभाग गतिशील
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरी आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ झपाटय़ाने वाढत असून परंपरागत भूमापन पद्धतीला फाटा देत आता नव्याने इलेक्ट्रॉनिक्स टोटल मशीन अर्थात ‘ईटीएस’ मशीनद्वारे जमीन मोजण्याचे काम होणार आहे. भूमी अभिलेख विभागाचा कारभार अद्ययावत व्हावा, यासाठी परंपरागत भूमापनाला विश्राम देत ईटीएस मशीनचा जमीन मोजण्यासाठी वापर करण्यात येणार आहे.
येथील भूमीअभिलेख यंत्रणेचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी त्यांना जिल्हा नियोजन निधीतील नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत 9 इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. बी एन. पाटील यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आले. भूमी अभिलेख विभागाअंतर्गत मोजणी कामाचा जलद निपटारा करण्यावर भर दिला जाता आहे. हे काम अचूक व उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हावे, या दृष्टीने पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून 9 ई.टी.एस प्राप्त झाली आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांसाठी या मशिनच्या वापराबाबत दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्याहस्ते तालुक्यातील अधिकाऱयांना मंगळवारी ई.टी.एस मशीनचे वाटप करण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख रत्नागिरी जिल्हा अधीक्षक एन. एन. पटेल यांनी दिली.
यावेळी उपअधीक्षक के. व्ही. शिंदे, एस. एम. शिंत्रे, बी. जे. कोकणे, जी. एल. गिजबिले, एस. बी. शिर्के, डी. के. निकाळजे व तालुक्याचे कर्मचारी उपस्थित होते. मोजणी कामी नवीन तंत्रज्ञान व साहित्य मिळाल्याने मोजणी कामाला गती मिळणार आहे. हे मशीन प्राप्त होण्यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त एम. के. सुधांशु, अप्पर जमाबंदी आयुक्त रायते, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळय़े यांचे विशेष सहकार्य लाभले.