कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविला, पहिल्यांदा राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने यावर टीका केली होती मात्र त्यानंतर देशातील जवळपास सर्वच राज्यात आता कोरोनाने कहर केला असून 90 टक्के भारतात आता
लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यामुळे आता 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केल्यानंतरही भाजपचे नेते यावर काही बोलले नाहीत कारण आता देशातच लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कडक निर्बंधासह लागू केलेल्या लॉकडाऊनला 1 जूनपर्यंत वाढविले असून राज्याने एप्रिलच्या मध्यातच लॉकडाऊनच्या दिशेने पावले टाकल्याने राज्यातील रुग्णसंख्या आता कमी होत असली तरी राज्यातील ग्रामीण भागात अद्यापही काहीसे चिंतेचे वातावरण आहे. एप्रिल आणि मे महिन्यात दुसऱया लाटेचा महाराष्ट्राला चांगलाच तडाखा बसला. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, व्हेंटिलेटरची कमी संख्या, ऑक्सिजन अभावी झालेल्या रुग्णांचा मृत्यु तसेच आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या. कधी त्यात
ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना तर कधी रुग्णालयाला आग लागल्याने मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली, मात्र हे सगळे होत असताना राज्यातील राजकारण मात्र चांगलेच रंगले होते आरोप-प्रत्यारोपांच्या लाटा काही कमी होताना दिसत नव्हत्या आणि त्या अजूनही काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत, भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचे हात जोडून सांगितले, गडकरी यांनी केलेल्या आवाहनाचे सोशल मीडियावर चांगलेच स्वागत होत असताना राज्यातील भाजप नेत्यांना लोक आत्मचिंतन करण्याचा सल्ला देताना दिसत होते. पूर्वी देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील होते, त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते सतत सरकारचे अपयश असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका करत होते, मात्र आता परिस्थिती बदलली आहे,
आता देशाच्या रुग्णांचा आकडा हा रोज 3 लाखाच्या पुढे जात असून महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही 50 हजाराच्या खाली स्थिरावली आहे. त्यामुळे आता हा आरोप कमी झाला असून सर्वोच्च न्यायालयाने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुब्रमण्यम स्वामी तसेच इतर अनेक लोकांनी महाराष्ट्राने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कामाचे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्यानंतर त्याच दिवशी काही तासातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कमी चाचण्या केल्या जात असून मृत्यु संख्या लपविल्याचा आरोप केला तर रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या कोटय़ाबाबत केंद्राकडे मागणी केल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी केवळ सरकारवर आरोपच करायचे त्यात आता तर कोरोनासारखी आपत्ती असताना विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप करताना खालची पातळी गाठली आहे. परवा देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच केंद्र सरकार देणार तर तुम्ही काय माशा मारणार का अशी टीका राज्य सरकारवर केली तर याच टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता फडणवीस यांना भविष्यात माशा मारायचे कामच शिल्लक राहणार असल्याचा टोला लगावला, त्यामुळे लोकांनाच आता या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मात्र एक नक्की की विरोधी पक्ष असलेल्या भाजपने पहिले काही महिने सरकारवर टीका केली होती, राज्य सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याचा आरोप केले तेव्हा पहिली लाट होती मात्र दुसऱया लाटेच्यावेळी राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारने अधिक दक्ष असायला हवे होते, मात्र केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास नडल्यानेच आता देशातील रुग्णसंख्या वाढत आहे, केंद्र सरकारने रेमडेसीवीर, लसी यांचे अधिकार स्वतःकडेच ठेवल्याने आता राज्याला केंद्राच्या मदतीशिवाय काही करता येत नाही, परवाच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून स्वतःचे अपयश झाकण्यासाठीच मोदींवर आरोप केला जात असल्याचे म्हटले, याच फडणवीस यांनी पोलीस बदल्यांचे मोठे
रॅकेट उघडकीस करताना फोन टॅपिंग प्रकरणाचा भांडाफोड करताना त्याच दिवशी लगेच दिल्ली गाठत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली होती मात्र फडणवीस यांचे केंद्रात असणारे वजन आणि पंतप्रधानांचे ते ‘ब्लू आईड बॉय’ असल्याने त्यांनी राज्यातील कोरोनाच्या उपाययोजनांसाठी लसींच्या अधिक मात्रा मिळाव्यात किंवा रेमडेसिवीरसाठी कोणाची भेट अथवा पत्र लिहिल्याचे आठवत नाही. फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या पत्राचा पलटवार करताना देशाला स्मशानभूमी बनविणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस कधी करणार असाच थेट सवाल केला. त्यावर फडणवीस यानी नानांची टीका मी कधीच गंभीरपणे घेत नाही, त्यांना मी कधी प्रत्युत्तरही देत नाही, मला तशी गरजही वाटत नाही असे सांगून मी नरेंद्र मोदींना वारंवार पत्र लिहित असतो असे सांगितले.
भाजपने आता तरी आपली भूमिका बदलावी केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यात थेट रस्त्यावरच थयथयाट केला. आता केंद्र सरकारने युपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आता कोणाला जाब विचारणार? कोरोनाच्या दुसऱया लाटेत वाढलेली मृत्यु संख्या बघता तिसऱया लाटेसाठी सज्ज होण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन आतापासून तयारी करण्याची गरज आहे.
दोनच दिवसापूर्वी कमी वयात तळागाळात काम करून हिंगोलीसारख्या जिह्यातून येऊन देशव्यापी नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण करणाऱया आणि महाराष्ट्रासाठी दिल्लीतील आश्वासक नेतृत्व असणाऱया काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले, हा काँग्रेससाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
प्रवीण काळे