अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या वाढतेय : आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्याची गरज
महेंद्र पराडकर / मालवण:
आजवर देशातील पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती आणि त्यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टीला बसणाऱया तडाख्यांचे प्रमाण नेहमीच जास्त राहिले आहे. चक्रीवादळांच्या बाबतीत पश्चिम किनारपट्टी नेहमीच सुरक्षित असल्याचे मानले जाते. परंतु गेल्या दशकभरात अरबी समुद्रातील वादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता पाहता, पश्चिम किनारपट्टीही आता चक्रीवादळांच्या बाबतीत तितकीशी सुरक्षित राहिलेली नाही. अरबी समुद्राच्या तापमानात होत असलेली झपाटय़ाने वाढ आणि वातावरणातील बदल ही यामागची महत्वपूर्ण कारणे असल्याचे तज्ञांचे मत आहे.
डिसेंबर 2004 मध्ये झालेल्या त्सुनामीचा सर्वाधिक फटका पूर्व किनारपट्टीवरील तामिळनाडू राज्याला बसला होता. पूर्व किनारपट्टीलाच चक्रीवादळे आणि त्सुनामीचा धोका जास्त का आहे, यावर बऱयाचदा कारणमीमांसा होत असते. पण जागतिक हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर आता अरबी समुद्रात निर्माण होणाऱया चक्रीवादळांचे प्रमाण गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत वाढलेले आहे. 2009 मध्ये ‘फयान’ चक्रीवादळाचा ‘भयाण’ अनुभव जिल्हावासीयांनी घेतला. हे वादळ मध्यरात्री
एकच्या सुमारास जिल्हय़ात सक्रीय झाले होते. त्यावेळेस पूर्वसूचनेबाबत प्रशासकीय यंत्रणा तुलनेने आजसारखी पुढारलेली नव्हती. त्यामुळे त्याचा मोठा फटका त्यावेळी मच्छीमारांना बसला होता. त्यानंतर 2019 मध्ये ऐन दिवाळी सणातच क्यार चक्रीवादळामुळे जिल्हय़ातील मच्छीमारांबरोबरच शेतकरी, बागायतदार आदींचे मोठे नुकसान झाले होते. निसर्ग, ओक्खी आणि महाचक्रीवादळाचांही प्रभाव कोकणावर राहिला. निसर्ग चक्रीवादळाने गतर्षी रायगड आणि रत्नागिरी जिल्हय़ांमध्ये हाहाकार उडवला होता. नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने काही कोटींचे आर्थिक पॅकेजही जाहीर केले होते.
अरबी समुद्रात वादळे वाढली
1891 ते 2000 पर्यंत 48 वादळे पश्चिम किनाऱयावर आली. त्यापैकी 24 तीव्र स्वरुपाची होती. हीच संख्या पूर्व किनाऱयावर 308 इतकी होती. यात तीव्र स्वरुपाची 103 वादळे होती. उत्तर हिंद महासागरामध्ये गेल्या दशकापेक्षा या दशकात तीन पटीने वादळे वाढली आहेत. एका वर्षात एक तीव्र वादळ अपेक्षित असे. आता एका वर्षात तीन वादळे येत आहेत. वादळाची तीव्रता, वाऱयाचा वेग, नुकसान वाढलेले आहे. संपूर्ण जगाच्या 10 टक्के वादळे उत्तर हिंद महासागरात येतात. यापैकी एक तृतीयांश भारताच्या पश्चिम किनाऱयावर येतात. परंतु नुकसान जास्त होते. अरबी समुद्रात पाणी बंगाल उपसागरापेक्षा थंड आहे. म्हणून बंगाल उपसागरापेक्षा अरबी समुद्रात वादळे कमी होतात. परंतु आता अरबी समुद्राच्या तापमानातही झपाटय़ाने वाढ होत असल्याने आणि एकूणच जागतिक हवामानाच्या बदलामुळे पश्चिम किनाऱयावर वादळांची संख्या वाढत चालल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
सतर्कतेचे आवाहन ठिक पण…
चक्रीवादळांच्या पूर्वसूचना देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्कता दाखवित असली, तरी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अद्याप सक्षम नसल्याचे पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाने स्पष्ट झाले आहे. स्थानिकांच्या मते तौक्ते चक्रीवादळावेळी आणि वादळानंतर ज्या पद्धतीची गतिमानता प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनावेळी दाखवायला हवी होती, तशी दाखविलेली नाही. देवगडमधील मच्छीमारांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मालवण तालुक्यासह जिल्हय़ातील बराचसा भाग हा सध्या विजेविना अंधारात आहे. हा अंधार कधी दूर होणार हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक घरांचे, माड बागायतींचे, मच्छीमार नौकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना अपेक्षित अशी आर्थिक भरपाई विनाविलंब शासनाकडून मिळणार का? असा सवाल केला जात आहे.