ग्रामपंचायतींवर जबाबदारी : पंधराव्या वित्त आयोगातून निधी खर्चाची मुभा : होम आयसोलेशन बंदच्या निर्णयानंतर पर्याय
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
‘रेडझोन’मध्ये गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांचे ‘होम आयसोलेशन’ बंद केल्यानंतर आता ग्रामस्तरावरच प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविली जाणार आहे. त्यासाठी शासनाने पंधराव्या वित्त आयोगमधून ग्रामपंचायतीना निधी खर्च करण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिली.
दरम्यान जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन सर्व गटविकास अधिकाऱयांना प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे शाळा व रिकाम्या इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली गावस्तरावर सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन जाहीर करून कडक निर्बंध घातले गेले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत काही जिल्हय़ांत कोरोना नियंत्रणात आला. मात्र राज्यातील 15 जिल्हय़ांत कोरोना नियंत्रणात आला नसल्याने हे जिल्हे ‘रेडझोन’मध्ये गेले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा समावेश आहे. कोरोना नियंत्रणात न येण्यामागे होम आयसोलेशनमधील रुग्ण निर्बंध पाळत नसल्याचे प्रमुख कारण समोर आले. त्यामुळे राज्य शासनाने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सद्यस्थितीत होम आयसोलेशनमध्ये असणाऱया रुग्णांना आयसोलेट कुठे करायचे, असा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
जिल्हा रेडझोनमध्ये का गेला?
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यास परवानगी दिली जात होती. परंतु होम आयसोलेशनमध्ये असणाऱया रुग्णांकडून निर्बंध पाळले जात नव्हते. घरातील व्यक्तींना संसर्ग होऊ लागला. हय़ाच व्यक्ती परत बाहेर फिरू लागल्याने कोरोनाचा फैलाव अधिकच वाढत गेला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात लॉकडाऊन करून दोन महिने झाले, तरी कोरोना नियंत्रणात आला नाही. त्यामुळे जिल्हा रेडझोनमध्ये गेला आहे.
पंधराशे बेड, साडेचार हजार रुग्ण
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने होम आयसोलशन बंद केल्यामुळे आता उपलब्ध बेडपेक्षा सक्रिय कोरोना बाधित रुग्ण जास्त असल्याने सर्व रुग्णांना आयसोलेशन कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हय़ात सद्यस्थितीत शासकीय व खासगी मिळून सर्व प्रकारच्या कोविड सेंटरमध्ये 1500 बेड उपलब्ध आहेत. परंतु सक्रिय रुग्ण साडेचार हजार आहेत. त्यामुळे उर्वरित दोन हजार रुग्णांना होमआयसोलेशनमधून बाहेर काढून कुठे आयसोलेट करायचे, हा प्रश्न आहे. मात्र यावर जिल्हा प्रशासनाने मार्ग काढला असून ग्रामस्तरावरवच प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या-त्या ग्रामपंचायतीवर जबाबदारी
जिल्हाधिकाऱयांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पूर्वी प्रत्येक गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींना गावातच संस्थात्मक विलगीरण केले जात होते. त्याप्रमाणे गावातच शाळा किंवा इतर रिकाम्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. शासनाकडूनही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवली जाणार असून ज्या गावात कोरोना बाधित रुग्ण अधिक प्रमाणात आहेत, अशा प्रत्येक गावात तीस किंवा तीसपेक्षा जास्त खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून उपलब्ध झालेल्या निधीतून 25 टक्के निधी कोविडसाठी खर्च करण्यास शासनाने मुभा दिल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
असे होणार आयसोलेशन
कोरोना बाधित रुग्णांना तीनस्तरावर आयसोलेशन करता येणार आहे. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, त्या रुग्णांना ग्रामस्तरावरील कोविड केअर सेंटरमध्ये, थोडी तीव्र लक्षणे आहेत, त्या रुग्णांना सध्या सुरू असलेल्या शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये आणि गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये आयसोलेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेणे शक्मय होणार असल्याचे सांगण्यात आले.
औषधे उपलब्ध करण्याची कार्यवाही
ग्रामस्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली असून जिल्हाधिकाऱयाच्या आदेशानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागाला गावस्तरावर कोविड सेंटरसाठी शाळा इमारती व इतर रिकामी इमारती शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत तसेच या सेंटरमध्ये औषधे उपलब्ध करून देण्याचीही कार्यवाही सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली.