वन्यजीव संरक्षक अभिजित महाले यांचे मत
राजेंद्र शिंदे/ चिपळूण
बिबटय़ा कुठेही राहू शकतो. कुठल्याही परिस्थितीशी तो सहजपणे जुळवून घेतो. भक्ष्य मिळत नसल्याने तो मानवीवस्तीकडे वळतो आहे. त्याला पिंजऱयात पकडणे हा अंतिम पर्याय नाही. बिबटय़ांची संख्याही वाढत असल्याने कितीजणांना पकडणार. बिबटय़ाची स्वत:ची हद्दच सुमारे 35 कि.मी. पर्यंत असते. त्यामुळे आता आपल्यालाच बदलावे लागणार आहे. मुंगुस, कोल्हा, तरस, लांडगे, अस्वल या प्राण्यांसोबत आपण जसे रहायला शिकलो तसंच आता बिबटय़ासोबतही जगणे आपण शिकायला हवे, असे मत पुणे येथील वन्यजीव संरक्षक अभिजित महाले यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीजवळील पावस, मेर्वी परिसरासह जिल्हय़ातील संगमेश्वर, राजापूर, लांजा, पाली, साखरपा येथे बिबटय़ाने पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. पावस परिसरात एका बिबटय़ाला पकडण्यात आले तरी तेथे दुसऱया बिबटय़ाचा उपद्रव सुरुच असल्याने ग्रामस्थांत बिबटय़ाची दहशत कायम आहे. या संदर्भात पुणे येथील रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्टचे, पंधरा वर्षांपासून वन्य प्राण्यांसंदर्भात काम करणारे व काही दिवसांपूर्वी मेर्वी परिसरात रेस्क्यू ऑपरेशनसाठी येऊन गेलेल्या अभिजित महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यात बिबटय़ांची वाढती संख्या, त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, आवश्यक जनजागृती या बाबत आपले मत मांडले.
अभिजित महाले म्हणाले की, सध्या बिबटय़ा माणसाच्या जवळपास राहण्यास शिकलेला आहे. त्याच्या पिढय़ान्पिढय़ा ऊसाच्या शेतात, लहान खुरटय़ा जंगलात आणि मानवी वस्तीच्या जवळ होत्या. हरीण, तृणभक्षी प्राणी हे त्यांचे नैसर्गिक भक्ष्य होते. ते आता कमी झाल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीतील वासरं, शेळय़ा, मेंढय़ा यांच्याकडे वळवला आहे. माणसांवर हल्ला करणे, हा त्याचा मूळ उद्देश नसतो. बिबटय़ा सामान्यत: आपल्यापेक्षा कमी ऊंचीच्या टप्प्यातील भक्ष्यावरच हल्ला चढवतो. बिबटय़ा लहानपणापासून जेथे वाढला आहे तेथून त्याला दूर जंगलात नेऊन सोडले जाते, त्यावेळी त्याला तेथील काहीच माहिती नसते. अशावेळी तो आक्रमक होऊ शकतो. बिबटय़ा पकडताना पिंजऱयाजवळ होणारी गर्दी, फोटोचे फ्लॅश यामुळे तो चवताळू शकतो. त्यामुळे ज्या भागात बिबटय़ा फिरत असेल त्या भागात त्याला पकडण्यापेक्षा तेथील लोकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे.
आतापर्यंत माणसांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये आढळले आहे की, सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळणारी लहान मुले, शेती काम करणारे तसेच उघडय़ावर शौचास बसलेल्यांवर बिबटय़ाचे हल्ले झाले आहेत. अशा प्रकारात बिबटय़ाला झाडा-झुडुपातून काहीतरी आकृती हलताना दिसते. त्याला तेथे कुठलातरी प्राणी आहे असे वाटते आणि अनावधनाने हल्ला होतो. आतापर्यंत बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात माणसाचे मांस खाल्याच्या घटना फारच कमी आहेत. अपघाताने असे हल्ले केल्यानंतर त्याने माणसाला सोडून दिलेच आढळले आहे. ज्यावेळी बिबटय़ाला घेरले जाते तेव्हाच त्याच्याकडून हल्ल्याची शक्यता असते.
दुचाकीस्वारांवरील हल्ल्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टय़ा एका प्रौढ बिबटय़ाचे वजन 50 ते 55 किलो असते. त्यामुळे त्याने गाडीवर हल्ला केला तर ती गाडी पडायला, फरफटत जायला हवी. मात्र तसे झालेले दिसत नाही. मुख्य म्हणजे दातांपेक्षा त्याच्या नखांमध्ये अधिक ताकद असते. क्षणात मारलेल्या पंजामुळे एकावेळेस तो 42 ते 45 टाके घालायला लागेल एवढी मोठी जखम करू शकतो. मात्र असेही घडलेले नाही. एखाद्या वेळेस बिबटय़ा व गाडी एकाचवेळी समोरासमोर येतात. अशा प्रसंगी बऱयाचदा माणूस गडबडून खाली पडतो. त्याला वाटते की बिबटय़ाने हल्ला चढवला. यामुळे बिबटय़ाबाबत जनजागृती महत्वाची आहे. लोकांशी संवाद वाढवायला हवा. तरच हल्ला रोखण्यास मदत होईल, यात वनविभागाची जबाबदारी मोठी आहे, असेही महाले यांनी सांगितले.
असेही फायदे…!
बिबटय़ाचा वावर सुरु झाला की तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. परंतु बिबटय़ाचा वावर काही बाबतीत फायदेशीरही ठरते. ज्या भागात बिबटय़ा किंवा वाघ असल्याची चर्चा सुरु होते त्या भागात पडणारे दरोडे आणि चोऱयां बंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. शेतीमधील चोऱयाही थांबल्याचे स्पष्ट झाले आहे. याचवेळी. शेतीचे नुकसान करणाऱया रानडुक्करांची संख्याही बिबटय़ामुळे नियंत्रित झाल्याचे पुढे आले आहे.