प्रतिनिधी / कोल्हापूर
सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारवरच आहे. तर राज्य सरकारने त्यांच्या आखत्यारित येणाऱ्या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता केली पाहिजे, अशी भूमिका शाहू छत्रपती यांनी मांडली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेसवर जावून शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तासभर चर्चा झाली.
केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही. मराठा समाजाने केलेल्या मागण्या राज्य सरकारशीही निगडीत आहेत. त्यावर राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या हेतूने स्थापन केलेल्या सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सारख्या संस्था सक्षम करण्याची व त्यांना स्वायत्तता देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून ती पार पाडावी, अशी अपेक्षा शाहू छत्रपतींनी व्यक्त केली.
दरम्यान, कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापत असतानाच पवार यांनी शाहू छत्रपतींची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच पवार यांनी या भेटीदरम्यान मालोजीराजे, मुधरिमाराजे यांच्याशीही संवाद साधला. शाहू महाराज यांच्या भेटीनंतर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि माणिक मंडलिक यांच्याशीही पवार यांनी चर्चा केली.