मुंबई/प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्रही दिलं आहे. दरम्यान राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या पराभवानंतरही शेतकरी आंदोलने सुरूच ठेवली आहेत. मध्यंतरी राजू शेट्टी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु काही दिवसांपासून राजू शेट्टी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य नेत्यांवर टीकाटिप्पणी आहेत. त्यामुळे शेट्टी यांचा विधानपरिषद आमदारकीचा पत्ता कट केल्याचं बोललं जात आहे.
राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण अद्याप याबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली असून मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार असा इशाराच राष्ट्रवादीला दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केले.