प्रवाशांना दिलासा, रात्रीचा प्रवासही झाला सुखकर, परिवहनच्या उत्पन्नात भर
बेळगाव / प्रतिनिधी
तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेली परिवहनची वातानुकूलित बससेवा सुरू झाली असून आता रात्रीच्या प्रवासासाठीदेखील वातानुकूलित बसेस धावत आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव आगारातून दररोज हैद्राबाद, तिरुपती, नाशिक, बेंगळूर, बेळ्ळारी, बिदर, सोलापूर आदी शहरांकडे या बसेस धावत आहेत.
कोरोनामुळे सर्व प्रकारच्या बसेस काही काळ बंद होत्या. त्यानंतर जिल्हय़ांतर्गत आणि राज्यांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. मात्र, लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी धावणारी वातानुकूलित बससेवा लांबणीवर पडली होती. गेल्या आठवडाभरापासून या बससेवेला सुरळीत प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर झाला आहे. सध्या वातानुकूलित बससेवा रात्रीच्या प्रवासासाठी धावताना दिसत आहे. या बसना प्रवाशांना प्रतिसाद वाढत असून बसस्थानकात आगाऊ तिकीट आरक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नात भर पडत आहे. आधीच कोरोना काळात बेळगाव विभागाला तब्बल 110 कोटींचा फटका बसला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आगारातून हैद्राबाद, तिरुपती, नाशिक, बेंगळूर, बेळ्ळारी, बिदर, सोलापूर आदी शहरांकडे रात्रीच्या प्रवासासाठी वातानुकूलित बसबरोबर परिवहनच्या साध्या बसही धावत आहेत. त्याबरोबरच प्रवाशांच्या संख्येनुसार मुंबईलाही बस धावत असल्याची माहिती परिवहनने दिली आहे.
बेळगाव आगारातून राज्यासह गोवा व महाराष्ट्रात बससेवा सुरळीत
बेळगाव आगारातून राज्यांतर्गत बससेवेसह गोव्यात व महाराष्ट्रात बससेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांनी मनात कोणतीही भीती न ठेवता प्रवास करावा, असे आवाहनही परिवहनने केले आहे. गोवा राज्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हय़ांत बेळगाव आगारातून बस धावत आहेत. यामुळे गोवा व महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱया प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवास
लॉकडाऊननंतर परिवहन मंडळाची प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांची वाहतूक करण्यास परिवहन मंडळाने परवानगी दिली होती. मात्र, आता शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर परिवहनच्या बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बसमधून प्रवास करणाऱया प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. बसेस निर्जुंकीकरण करूनच प्रवासासाठी सोडल्या जात असल्याची माहिती परिवहनने दिली आहे.