ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊन शब्द विसरून आपल्याला पुन:श्च हरिओम करायचे आहे. मिशन बिगीन अगेन मोहिम राबवायची आहे. हळूहळू राज्यातील निर्बंध उठवले जातील. मात्र, कोरोनासोबत जगताना आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
लॉकडाऊन 5.0 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.ठाकरे म्हणाले, लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या टोपलीत टाका. आपल्याला मिशन बिगीन अगेन राबवायचे आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या आयुष्याची सुरुवात करत आहोत. बाहेर फिरताना सुरक्षित अंतर ठेवावे. आपण हळूहळू राज्यातील निर्बंध उठवत आहोत. गर्दीला परवानगी दिलेली नाही. लॉकडाऊन करणे सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणे ही एक कला आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला तरी देखील मास्क वापरणे बंधनकारक आहे.
आतापर्यंत साडेसात लाखापेक्षा जास्त मजूर कामावर रुजू झाले आहेत. जिथे शाळा सुरु करणे शक्य आहे, तिथे शाळा सुरू करण्यात येतील. जिथे शाळा सुरू करणे शक्य नाही, तिथे ऑनलाईन शाळा घेण्यात याव्यात. येत्या काळात आरोग्य, शिक्षणावर भर द्यायचा आहे. अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टर ची सरासरी काढून गुण दिले जातील.
3 जूनपासून जॉगिंग, धावणे, सायकल चालवणे, व्यायाम करणे आणि उद्यानात जाण्यास परवानगी असेल. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 5 जूनपासून कंटेन्मेंट झोन वगळता सर्व दुकानदारांना सम-विषम तारखेस दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.7 जूनपासून वृत्तपत्र घरपोच मिळतील. मात्र, वृत्तपत्र वितरक मुलांची काळजी घेणे अनिवार्य आहे. 8 तारखेपासून सर्व खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होतील.
पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता यंदा पाऊस भरपूर आहे. येत्या काही तासात पश्चिम किनारपट्टीवर वादळ येण्याची शक्यता आहे. हे वादळ दिशा बदलेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, किनारपट्टीवरील लोकांनी सावध रहावे. मच्छिमारांनी चार दिवस समुद्रात जाऊ नये. पुराची आपत्ती आली तर आपण सज्ज आहोत.