रसाळ फणसाचा रस वर्षभर होणार उपलब्ध : पाळी – सांखळी येथील जैवविविधता मंडळाचा स्तुत्य प्रयत्न,आंब्यांचा राजा मानकुरादचाही रस तयार ,काजू, फणस, केळी, कोकमपासूनचे ताजे पदार्थ
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील जनतेला आता रेडिमेड रसाळ फणसाचा रस लवकरच उपलब्ध होणार आहे. जैवविविधता मंडळाच्या पाळी – सांखळी येथील बहुउत्पादक प्रक्रिया केंद्रामध्ये किमान 600 किलो ताज्या फणसाचा रस उपलब्ध करुन ठेवला आहे. या रसापासून घरगुती पद्धतीचे गोडधोड करता येणे शक्य होईल. या केंद्राकडून जायफळ पत्रीचा सुका मेवाही आता लवकरच बाजारात उपलब्ध केला जाणार आहे.
पाळी – सांखळी येथील जैवविविधता केंद्राच्या बहुउत्पादक प्रक्रिया केंद्राची महतीच निराळी. हे केंद्र गोव्यातील अनेक पारंपरिक उत्पादकांना प्रोत्साहन देणारे आहे. जे गोमंतकीयांना बाजारात सहज उपलब्ध नाही ते आता उपलब्ध करुन देण्याचा या केंद्राचा इरादा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे केंद्र दूर एका खेडेगावात असून देखील त्याचे सारे नियंत्रण महिलांकडेच आहे. महिलाच स्वतः हे केंद्र चालवित असतात. जैवविविधता मंडळाचे मुख्य संचालक डॉ. प्रदीप सरमोकादम यांच्या उपस्थितीत भेट दिली असता या केंद्राच्या स्थापनेपासून आतापर्यंतची विकासाची एकेक पायरी म्हणजेच गोव्यातील अनेक महिलांसाठी प्रेरणास्थानच म्हणावे लागेल. महिलांनीच चालविलेले हे केंद्र, विविध पारंपरिक गोमंतकीय उत्पादने इथे बनविली जातात आणि ‘गोवन्स’च्या नावाने त्याची विक्री केली जाते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रोत्साहन
राज्य जैविक विविधता मंडळातर्फे अनेक योजना आहेत. गोव्यातील पारंपरिक वस्तू, खाद्य पदार्थ, उत्पादने यांना प्रोत्साहन देण्याचाही एक भाग याला जोडला गेलेला आहे. गोव्यातील ग्रामीण भागात हा प्रकल्प सुरू करायचा होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी मतदारसंघात प्रकल्पाचे स्वागत केले. पाळीमध्ये हा प्रकल्प स्थापण्याचे ठरविले.
गोवा शिपयार्डची रु. 50 लाखाची मदत
गेल्या दोन वर्षात या प्रकल्पासाठी गोवा शिपयार्ड या कंपनीने सीएसआर अंतर्गत रु. 50 लाखाची मदत केली. त्या अंतर्गत वीज खात्याच्या विनावापर शेडमध्ये दुरुस्ती करुन शीतगृह स्थापन केले. मोठे ड्रायर आणून बसविले. फळांचा रस काढण्यासाठीची यंत्रणा, अशा छोटेखानी विविध यंत्रणाही खरेदी केल्या.
आंबा, फणस, कोकम, केळ्य़ांपासून उत्पादने
सुरुवातीस अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर एकूण 16 महिलांनी इथे नोंदणी केली. आता वर्षभरात 12 महिला हे केंद्र चालवितात. स्वतःच राबतात. केळ्य़ांचे चिप्स बनविणे, फणसाचे कुरकुरीत तळलेले गरे, गऱयांचे लोणचे, पापड, कैऱयांचे लोणचे, सांडगे, विविध प्रकारची सरबते, कोकम ज्युस, कोकम सरबत, भाजलेले काजू, फणस गऱयांचे साले (वाळलेले गरे) या शिवाय उन्हळ्य़ात फणसाची व आंब्यांची साठे हे प्रकारही इथे तयार करण्यात या साऱया महिला वर्षभर गुंतलेल्या असतात. इथे तयार केलेले उत्पादन विक्रीसाठी त्यांना मार्केट उपलब्ध करुन देणे हे मंडळासमोर एक आव्हान आहे. डॉ. सरमोकादम यांच्या म्हणण्यानुसार या उत्पादनाचे दर तसे माफक आहेत. आता लवकरच मार्केटिंग फेडरेशनशी आम्ही चर्चा करणार आहोत. सध्या अनेकजण या केंद्राला भेटी देऊन येथील उत्पादन खरेदी करतात.
मानकुराद आंब्याचा रस उपलब्ध
यावर्षी मानकुराद आंबा थोडा उशिरा आला. झाडावर आंबे होते मात्र उतरविणारी मंडळी कमीच. त्यामुळे आंबे अनेकांना उपलब्ध झाले नाहीत. तर गोव्याबाहेर असलेल्या व आता गोव्यात आलेल्या अनेकांना मानकुराद आंबे खाता आले नाही. या केंद्राने काही प्रमाणात आंबे मिळविले. हे सर्व मानकुराद आंबे असून त्याचा रस काढून तो आता विक्रीला उपलब्ध केला आहे. मानकुरादाचा रस सहसा उपलब्ध होत नाही. मात्र या केंद्राने तो उपलब्ध करण्याची व्यवस्था केलेली आहे.
आता फणसाचा रस बाजारात!
आजवर आंब्याचा व इतर फळांचा रस सर्वांनाच मिळत असे. परंतु, कधी कोणी फणसाचा रस काढून विकला नव्हता. पाळीच्या या बहुउत्पादन प्रक्रिया केंद्राने रसाळ फणसाचा रस काढून त्याची विक्री करण्याचे खरे तर फार मोठे धाडसच केलेले आहे. सध्या या केंद्राने सुमारे 600 किलो रसाळ फणसाचा रस काढून ठेवला आहे. फणसाकडे अनेकजण वक्र दृष्टीने पाहतात खरे परंतु, हे एक परिपूर्ण फळ आहे. या फळापासून जो रस काढला जातो. त्याचे विविध गोडधोड पदार्थ बनवितात. साणंद, धोंणस, फणस इडली, केक वगैरे अनेक प्रकार होतात. ऐन गणेश चतुर्थीमध्ये यंदा भक्तमंडळींना फणसाचा रस मिळणार आहे. गणपतीला गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखविताना फणसापासून बनविलेले गोड पदार्थ देखील समोर ठेवता येतील.
केंद्राचा फणसाकडे व्यवसायिक दृष्टिकोन
फणसाला सर्वत्र मागणी आहे परंतु, त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन कधी ठेवला नाही. या केंद्राने फणसाचे तळलेले गरे अर्थात वेफर्स, कच्चे गरे वाळवून त्याचे ‘साले’ बनविली आहेत. वर्षभरात कधीही पाण्यात भिजवून टाकून दुसऱया दिवशी ताज्या गऱयांच्या भाजीचा आस्वाद घेता येईल. फणसाचा रस, याशिवाय गऱयांचे लोणचे आणि फणसपोळी हे देखील आता उपलब्ध केले आहे.
गावठी तांदुळही उपलब्ध करणार : सरमोकादम
अलिकडेच दक्षिण गोव्यातही अशाच पद्धतीचे एक केंद्र सुरू केलेले आहे. हे केंद्र थोडे उशिरा सुरू झालेले असले तरी ते पुढे चांगले प्रगतीपथावर येणार आहे. राज्यातील अनेकांची मागणी आहे की गावठी तांदुळ उपलब्ध व्हावेत. गावठी उकडा तांदुळ मिळतो परंतु, ‘पेज’ करण्यासाठी लागणारा गावठी तांबडा सुरय तांदुळ मिळत नाही. या केंद्रातर्फे तो देखील उपलब्ध करण्याचा इरादा डॉ. सरमोकादम यांनी व्यक्त केला. सरमोकादम यांनी सांगितले की, फणसाचा दीड टन रस यावर्षी तयार केला आहे. त्यातील आतापर्यंत 500 किलो रस विकला देखील. आता 1 टनापर्यंतच रस उपलब्ध आहे. रु. 250 ते 300 प्रतिकिलो या प्रमाणे हा रस ग्राहकांना उपलब्ध करुन देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जायफळाच्या टरफलापासून सुकामेवा
या केंदाने जायफळांच्या टरफलांपासून अत्यंत स्वादिष्ट असा सुकामेवा उपलब्ध करुन दिला आहे. जायफळाची फळे तयार झाल्यानंतर आतील काळी बी म्हणजेच जायफळ. त्या बाहेर पिवळ्य़ा रंगाच्या जाड सालीचा काही उपयोग होत नव्हता. तो आता प्रत्यक्षात उपयोगात आणण्याचे केंद्राने ठरविले आहे. मंडळाने त्यातील काही महिलांना जुने गोवे येथील आयसीएआर केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविले. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर आता या महिला स्वतः जायफळ पत्रीचा सुंदर असा सुकामेवा बनवितात. हा बाहेर महाग असला तरी या केंद्रातून तो माफक दरात विकला जातोय.
बारा महिलांना प्रत्यक्ष रोजगार
खाण क्षेत्रावर अवलंबून असलेल्या पाळी गावातील महिलांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रोत्साहन दिले. आज या केंद्रामधून 12 महिलांना थेट रोजगार उपलब्ध झालाय, शिवाय अप्रत्यक्षात अनेकांना रोजगार मिळाला. शिवाय गोमंतकीयांना त्यांच्या उत्पादनाला आता चांगला भावही मिळू लागला. पाळीच्या या केंद्राचे भाग्य आता फळफळू लागेल. खाणी बंद पडल्या म्हणून काय झाले? पर्याय तर निवडलाच पाहिजे. या महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ठरविले. त्यांचे यश त्यांच्याच हाती आहे. सरकार प्रोत्साहन देतेच. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वारंवार या केंद्राला भेट देऊन जातात. पाळीची ही यशोगाथा गोव्यातील इतर भागात का नाही होऊ शकत? महिलांनी अवश्य विचार करावा. जैवविविधता मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी ध्यास लागल्यासारखे मागे लागून हे केंद्र तयार केले. अशीच केंद्रे गोव्यात प्रत्येक तालुक्यात तरी झालीच पाहिजेत. त्यातून गोव्याचा खरा गोमंतकीय पद्धतीचा ब्रॅण्डही साऱया जनतेला उपलब्ध होईल व रोजगारही मिळेल.