पंजाबमध्ये भगवंत मान 16 मार्च रोजी घेणार शपथ; उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये भाजपकडून पूर्वतयारी
नवी दिल्ली, चंदीगढ / वृत्तसंस्था
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येताना दिसत आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) बंपर विजय मिळवल्यामुळे भगवंत मान यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 16 मार्च रोजी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंजाब वगळता निवडणूक झालेल्या इतर चारही राज्यांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आल्यामुळे येत्या आठवडय़ात तेथेही केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा घेण्यासाठी ‘मुहूर्त’ शोधण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे.
पंजाबमध्ये ‘आप’ने घवघवीत यश संपादन करत काँग्रेसच्या ताब्यातील राज्य हस्तगत केले आहे. आपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नेंदवत बहुमताचा आकडा लीलया पार केला. पंजाबमध्ये आपच्या नेत्यांकडून आणि प्रशासनाकडून आता शपथविधीची जय्यद तयारी केली जात आहे. शपथविधी सोहळय़ासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. शपथविधीपूर्वी ते 13 मार्च म्हणजेच रविवारी अमृतसरमध्ये ‘विजयी रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये दिल्लीचे केजरीवाल यांच्याशिवाय पक्षाचे अनेक बडे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
चन्नी यांनी दिला राजीनामा
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘मी माझा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपालांनी आपल्याला आणि मंत्रिमंडळाला कायम राहण्यास सांगितले आहे. मला जनतेचा जनादेश मान्य आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले. आपने एकूण 117 जागांपैकी तब्बल 92 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या तब्बल 69 जागा कमी झाल्या असून यावेळी काँग्रेसला फक्त 18 जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला अंतर्गत कलहाचा फटका बसला. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारख्या बलशाली नेत्यांचा पराभव झाला आहे.
पंतप्रधान मोदींनी केले केजरीवालांचे अभिनंदन
पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आम आदमी पार्टीचे अभिनंदन केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांचे ‘धन्यवाद सर’ असे री-ट्विट करत आभार मानले आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये ‘होळी’पूर्वी योगींचे शपथग्रहण?
उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱयांदा स्पष्ट बहुमत मिळवणारे योगी आदित्यनाथ होळीच्या आधीच दुसऱयांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची दाट शक्मता आहे. योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱयांसोबत होळीच्या आधी म्हणजेच 15 मार्च रोजी पदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. सलग दुसऱयांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे योगी हे उत्तर प्रदेशचे पाहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत. या शपथविधी सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह काही निवडक केंद्रीय मंत्री उपस्थित राहू शकतात. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 403 जागा असणाऱया उत्तर प्रदेशात 255 जागांवार भाजपाने विजय मिळवला आहे. विधानसभेमधील बहुमताचा आकडा 202 इतका असल्यामुळे भाजप लवकरच सत्तास्थापनेसाठी दावा करून शपथविधीचा कार्यक्रम निश्चित करणार आहे.
अन्य राज्यांमध्येही हालचाली गतिमान
उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्येही सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाकडून पक्षनिरीक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर ते राज्यांमध्ये रवाना होऊन नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतील. या बैठकीत निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. त्यानंतर शपथविधी सोहळय़ाची तारीख, वेळ आणि स्थळ निश्चित केले जाणार आहे.