भाजप देशात हिंसा, द्वेष पसरवतोय ः शेगावमधील सभेत राहुल गांधी यांचा आरोप
प्रतिनिधी/ शेगाव, बुलढाणा
भाजपने देशाच्या कानाकोपऱयात हिंसा, द्वेष आणि दहशत पसरवली आहे. हिंसा आणि द्वेषाने देशाला कधीच फायदा होणार नाही. याविरोधात माझी भारत जोडो यात्रा आहे. रस्त्यावर चालणाऱयांनाही पाच मिनिटांत लक्षात येईल की, हिंसा कोण पसरवित आहेत, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी शुक्रवारी शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. दरम्यान, या भाषणात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्य़ावर बोलणे टाळले.
राहुल गांधी म्हणाले, 70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली आहे. महाराष्ट्र ही महापुरुषांची धरती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. यापैकी कोणीही हिंसेची गोष्ट केली नाही. म्हणून आम्ही ही यात्रा काढली आहे. ते तोडण्याचे काम करतात, आम्ही जोडण्याचे काम करतो. भारत जोडोचे ध्येय हे ‘मन की बात’ करण्यासाठी नाही, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.
पंतप्रधानांनी शेतकऱयांचे दुःख समजून घ्यावे
विदर्भातील शेतकऱयांना त्रास सहन करावा लागत आहे. विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱयांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱयांवर अन्याय होत आहे. शेतकऱयांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही हजारांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करत आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधानांनी जर शेतकऱयांचे दुःख मनापासून समजून घेतले तर कोणीही आत्महत्या करणार नाही.काही उद्योगपतींचे मात्र हजारो कोटींचे कर्ज माफ केले जाते, दोन-तीन उद्योगपती देशाचे कर्ज बुडवत आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
शेतकऱयांसोबतच येथील तरुणही सैरभैर
शेतकऱयांसोबतच येथील तरुणही सैरभैर झाला आहे. देशातील युवक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात फुकत शिक्षण मिळत नाही. मुलांचे पालक लाखो रुपये शिक्षणासाठी देतात पण पुढे काय होते? काय ऐकायला मिळते? काय काम करतात काहीच नाही. बेरोजगार आहे. त्यांची स्वप्ने मोठी आहेत. मात्र हे तरुण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कोणत्याही बेकारांना विचारले तर ते उच्च शिक्षित असल्याचे दिसते. हे तरूण मजुरी करतात ऊबेर टॅक्सी चालवतात, असा देश आम्हाला नको व आम्ही ते होऊही देणार नाही. तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे.
वादग्रस्त वक्तव्यावर बोलणे टाळले
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेगाव येथे त्यांनी आज जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपले दुःख समजून घेण्याचा आहे, असे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधी सावरकर यांच्यावर बोलतील असे सर्वांना वाटले होते. मात्र, त्यांनी सावरकर यांच्यावर बोलणे टाळले.
मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण
सभेआधी राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण केला. आपले ताट स्वतः उचलून वॉश बेसिनमध्ये नेले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. राहुल गांधी यांना मंचावर पोहोचताच वारकऱयांचा फेटा घालण्यात आला.
मनसैनिकांना पोलिसांनी चिखली नाक्यावरच रोखले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर मनसेने शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱया काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचे मनसेने म्हटले आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखली नाक्यावर रोखले आहे.