उत्तरप्रदेशातील मेरट येथील एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे अनोखे जॅकेट बनविले आहे. हे जॅकेट रणभूमीवर लढणाऱया सैनिकांसाठी आहे. त्याचे वैशिष्टय़ असे आहे की, ते केवळ सैनिकाचे कवच बनून न राहता त्याचे शस्त्रही होऊ शकते. या जॅकेटमधून शत्रूवर गोळय़ा झाडल्या जाऊ शकतात, अशी गोळय़ा झाडणाऱया जॅकेटची निर्मिती भारतात प्रथमच करण्यात आली आहे.
या जॅकेटमध्ये काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. लढताना सैनिक जखमी झाल्यास त्याची सूचना नियंत्रण कक्षाला देण्याची व्यवस्था या जॅकेटमध्ये आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या जागी जखमी अवस्थेत आहे ते समजू शकते. त्यामुळे अशा सैनिकांना वेळेवर वैद्यकीय व इतर साहाय्य पुरविले जाऊ शकते. या जखमी किंवा बेशुद्ध सैनिकाला पकडण्यासाठी शत्रूचे सैनिक जवळ आल्यास हे जॅकेट त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना दूर ठेवते. या जॅकेटमधून होणाऱया गोळीबारात शत्रूचे सैनिक ठार होण्याचीहीशक्यता असते. अशा प्रकारे आपल्या सैनिकांना शत्रूच्या तावडीत जाण्यापासून वाचविण्याची क्षमता या जॅकेटमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. जॅकेटमधून सुटणाऱया गोळय़ा 200 मीटर अंतरापर्यंत लक्षवेध करू शकतात. या जॅकेटमध्ये सौर ऊर्जा देणारी प्लेट, अलार्म, सेन्सर, ट्रान्समिटर, रिसिव्हर, जीपीएस, कॅमेरा इत्यादी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असल्यामुळे ते सैनिकाचे अभेद्य कवच बनू शकते.