श्रीसुब्रह्मण्य स्वामी यांचे विवेचन : भालचंद्र महाराज दरबारचा वर्धापनदिन उत्साहात
प्रतिनिधी /पणजी
आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रथम गुरूला शरण जा. नंतर त्यांना प्रश्न विचारा. गुरू समवेत राहून गुरूसेवा करा. ज्ञान प्राप्तीसाठी गुरुमुखातून आलेल्या शब्दांचे चिंतन करा. कर्मयोगात प्रयत्नवादाला महत्व असते. ईश्वराचे दर्शन होण्याकरिता संपूर्ण शरणागती पत्करा. तसेच अहंकार बाजूला ठेऊन कोणत्याही वाईट विचारांना थारा न देता चांगल्या विचाराने चांगले कार्य करत रहा. ईश्वर सदैव तुमच्या पाठिशी राहिल, असे आशीर्वचनपर मार्गदर्शन के. के. हल्ल्याळ (कर्नाटक) येथील श्रीनित्यानंद आश्रमाचे पीठाधीश श्रीसुब्रह्मण्य स्वामी महाराज यांनी केले.
सांखळी मतदारसंघातील चावडी पाळी येथे श्री भालचंद्र महाराज दरबार मठ व मूर्ती स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त श्री स्वामी महाराजांच्या पावन उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पुढे बोलताना श्री स्वामी महाराजांनी गुरूमुखातून श्रीमद् भागवद् श्री भगवद्गीता ऐकावी. प्रत्येकाने शास्रात सांगितल्याप्रमाणे जीवन जगावे, बुद्धी स्थीर ठेवावी. श्रवणाद्वारे ईश्वर आपल्या हृदयात पूजावा. गुरूतत्व एकच असते. गुरु वेगवेगळे देह धारण करतात, पण सर्वांचा मार्ग एकच असतो. परमेश्वराचे चिंतन, दर्शन आणि गुरुकृपेमुळे मोक्ष प्राप्ती होते, असे सांगितले.
प्रारंभी ऍड. गोकुळदास नाईक यांनीगुरुतत्वावर विवेचन केले. त्यावेळी श्रीसुब्रह्मण्य स्वामी सेवा ट्रस्टचे श्रीराम महाले, विलास नाईक, सुरेश चोडणकर, अंकूश नार्वेकर, यांची उपस्थिती होती. भालचंद्र महाराज दरबारचे जितेंद्र चावडीकर यांनी सुत्रसंचालन केले. मठाचे अध्यक्ष संतोष नाईक यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमास स्थानिक आमदार तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावून सद्गुरू सुब्रह्मण्य स्वामी महाराजांचे दर्शन घेतले.