भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांचा विश्वास : ‘आत्मनिर्भर भारत संवाद’ अभियानाचा कुडाळ येथे समारोप
वार्ताहर / कुडाळ:
केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघुउद्योग व रोजगार उपलब्ध करून सर्वसामान्य घटकांना सक्षम करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ ही व्यापक संकल्पना आणली. आर्थिक सधन होण्याची ताकद या योजनेत आहे. आपण सर्वांनी सक्रिय होऊन तळागाळापर्यंत ही योजना पोहोचवून सिंधुदुर्ग आत्मनिर्भर बनवून प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनेल, असा विश्वास भाजप नेते व राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी शुक्रवारी कुडाळ येथे व्यक्त केला.
मोदी यांच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारत संवाद’ अभियानाचा समारोप कार्यक्रम शुक्रवारी तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महालक्ष्मी सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, जि. प. अध्यक्षा सुमेधा नाईक, उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, या अभियानाचे जिल्हा संयोजक अतुल काळसेकर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेर्से, नगराध्यक्ष ओंकार तेली, संजू परब व राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत व अशोक सावंत, राजू राऊळ, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जि. प. माजी अध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्य अंकुश जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा चिटणीस बंडय़ा सावंत, प्रसन्न देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
तावडे म्हणाले, कोरोनासारखे संकट आल्यानंतर मोदी यांनी सर्वसामान्य घटकांना आधार देण्यासाठीच खऱया अर्थाने आत्मनिर्भर कल्पना पुढे आणली. शेतकरी, मजूर, महिला बचतगट, मच्छीमार तसेच लहान उद्योग-व्यवसाय करण्यासाठी या योजनेतून मोठे पॅकेज उभे केले. कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरिबांचा रोजगार बंद झाला. आर्थिक दुर्बलता निर्माण झाली. तेव्हा मोदी सरकारने अशा कुटुंबांना केंद्राच्या माध्यमातून धान्य व त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. शेतकऱयांचा माल खराब होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने नियोजन केले, याकडे लक्ष वेधत शेतकरी, कृषी, काजू-कोकम, महिला बचतगट, मच्छीमार, औषधी वनस्पती, मधुमक्षी, फेरीवाले, मजूर यामध्ये आर्थिक सक्षमता निर्माण होण्यासाठी केलेल्या पॅकेजची आकडेवारी त्यांनी समोर मांडली.
राज्य शासनाची सक्रियता दिसली नाही!
कोरोना काळात थेट रस्त्यावर उतरून सामान्य माणसांना मदतीसाठी येथील भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते पुढे होते. पण दुसरीकडे राज्य शासनाची सक्रियता दिसली नाही. भाजप नेते जिल्हय़ाजिल्हय़ात आढावा घेत आहेत. मात्र, आरोग्यमंत्री सोडले, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सत्ताधारी नेते दिसले नाहीत. उत्तम आरोग्य सेवेसाठी सत्ताधाऱयांनी पावले टाकली नाहीत, हे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली.
राजन तेली म्हणाले, आर्थिक दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी या योजनेतून वीस लाख कोटीपेक्षा जास्त पॅकेज मिळणार आहे. ही योजना तळागाळापर्यंत नेण्याची जबाबदार आपणा सर्वांची आहे. या योजनेचा फायदा लोकांना करून दिला पाहिजे. कोरोनामुळे काही चाकरमानी व गोव्यात जाणाऱयांचा रोजगार बंद झाला. त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करुया. केंद्रातील योजना आल्यानंतर त्यांचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचे काम येथील शिवसेना खासदार, जिल्हा बँक अध्यक्ष व शिवसेना करीत आहे.
पुस्तिकेचे प्रकाशन
केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन तावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेचे लाभार्थी शशिकांत खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
तावडे यांचा नागरी सत्कार
तावडे यांच्या रुपाने कोकणातील राजकीय नेतृत्वाला पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सचिवपद मिळाल्याने त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्गातील तुमच्या हक्काच्या माणसाला राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतले आहे. हे पद नाही, तर जबाबदारी आहे. केंद्राची मदत लागेल, त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करेन, अशी ग्वाही तावडे यांनी दिली. प्रास्ताविक अतुल काळसेकर, तर सूत्रसंचालन प्रभाकर सावंत यांनी केले.
तेथे मोर्चा, जमाव घेऊन जाणे योग्य आहे का?
उत्तरप्रदेशमधील त्या पीडित युवतीवरील अत्याचार प्रकरणी तावडे म्हणाले, महिलांवरील अत्याचाराची कुठलीही घटना धीक्कार करण्यासारखीच आहे. सरकार कुणाचेही असो. कुणीही त्याचा राजकीय फायदा उठवू नये. राजकीय पोळी भाजण्याची ती वेळ नसते. पीडितेला न्याय मिळण्यासाठी एकत्र आले पाहिजे. तेथे मोर्चा, जमाव घेऊन जाणे योग्य आहे का? महिलांवरील अत्याचाराबाबत महाराष्ट्र एक नंबरला आहे. त्याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.