प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांना फटका बसला आहे. रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे फेरीवाले अडीच महिन्यांच्या कालावधीत अडचणीत आले आहेत. फेरीवाल्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान फेरीवाले आत्मनिर्भर निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याकरिता महापालिकेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले. रस्त्याशेजारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱया फेरीवाल्यांनादेखील लॉकडाऊनची झळ बसली. त्यामुळे त्यांचे व्यवसाय मोडकळीस आले आहेत. फेरीवाल्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र शासनाने विविध योजनांची घोषणा केली आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत फेरीवाल्यांना व्यवसायाकरिता दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. महापालिकेकडे नोंदणी केलेल्या तसेच बिगर नोंदणी फेरीवाल्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो. या योजनेच्या लाभाकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज करता येऊ शकतो. किंवा महापालिका कार्यालयात संपर्क साधून अधिक माहिती घेता येऊ शकते. या योजनेच्या लाभाकरिता महापालिकेच्या गरिबी निर्मूलन विभागात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीकरिता 0831-2405337 आणि 9481504229 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.