मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : बँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई योजनेचा शुभारंभ
प्रतिनिधी / पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील आत्मनिर्भर भारत योजनेच्या धर्तीवरच आम्ही गोव्यात स्वयंपूर्ण गोवा ही योजना लागू केली असून त्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊन राज्यास स्वयंपूर्णतेकडे जाणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे पणजीत आयोजित ’एमएसएमई आणि बिल डिस्काऊंटिंग व्हेंडर आऊटरीच’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. बँकेच्या विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविणे तसेच मध्यम, लहान, सुक्ष्म यासारख्या प्रत्येक उद्योग क्षेत्रातील कंत्राटदार, उद्योजक आणि व्यावसायिकांना सुटसुटित कर्जवितरण करण्यासंबंधीच्या योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. त्यामुळे सर्वांचेच हात बांधले गेले आहेत. तरीही पंतप्रधानांच्या विविध योजनांमुळे आम्ही यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहोत. ही गती खूपच मंद असली तरीही समाधानकारक आहे. मात्र त्यात यश नक्की प्राप्त होणार आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत च्या हाकेमुळे आमचे मध्यम, लहान, सुक्ष्म उद्योग खात्रीने मजबूत होतील. हे सर्व उद्योग रोजगारक्षम आहेत. देशाच्या विकासातील ते महत्वाचे घटक आहेत. सध्या देशाच्या एकूण उत्पादनक्षमतेत मध्यम, लहान, सुक्ष्म उद्योगांचे योगदान 45 टक्के एवढे आहे. तसेच 40 टक्के निर्यात आणि 9 टक्के जीडीपीतही योगदान आहे.
मध्यम, लहान, सुक्ष्म या उद्योगांना विविध सरकारी खात्यांकडून देय असलेली त्यांच्या बिलांची रक्कम 45 दिवसांच्या आत अदा केलीच पाहिजे अशी सरकारचीच मार्गदर्शक तत्वे असली तरीही कोरोनामुळे गेल्या कैक महिन्यांपासून या उद्योगांना बिलांची रक्कम मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येतून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ट्रेड रिव्हर्सिबल डिस्काऊंटिंग सिस्टम हे पोर्टल सुरू केले आहे. गोवा सरकारनेही या पोर्टल माध्यमाचा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे आजपर्यंत सुमारे 95 कंत्राटदारांची सुमारे 100 कोटी रुपयांची बिले फेडण्यात आली आहेत. यात बँक ऑफ महाराष्ट्रचेही मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले.
बँकेच्या गोवा विभाग प्रमुख नर्मदा सावंत यांनी स्वागत केले. सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत कुमार टम्टा यांनी आपल्या भाषणात बँकेच्या विविध योजना व भविष्यातील उपक्रमांबद्दल माहिती दिली. देशासह गोव्यातही व्यवसाय विस्ताराची बँकेची योजना असून राज्याच्या विविध भागात येत्या काळात आणखी शाखा खोलण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
नंदिनी यादव आणि विनय गायकी यांनी सुत्रसंचालन केले. हितेश्वर यांनी पावर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून बँकेच्या योजनांचे सादरीकरण केले. कार्यक्रमास उपस्थितांमध्ये विविध सरकारी अधिकारी आणि बँकेचे प्रमुख ग्राहक उपस्थित होते. नाताळच्या पूर्वसंध्येला आयोजित या सोहळ्याचा समारोप संगीतमय कार्यक्रमाने करण्यात आला.