‘युएन’ महासभेत पंतप्रधान मोदींचा आशावाद : संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची अपेक्षा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाची स्थिती मजबूत असताना आम्ही कोणालाही त्रास दिला नाही. तसेच ‘मजबूर’ असतानाही आम्ही कोणावर ओझे लादलेले नाही, असे सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना शनिवारी केले. तसेच कोरोनाच्या संकटात दीडशेहून अधिक देशांना वैद्यकीय मदत केल्याचा दाखला देत ‘भारताची लसनिर्मिती आणि लस पुरवठा क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येईल’ असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तिसऱयांदा संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) 75 व्या बैठकीस संबोधित केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची अपेक्षाही बोलून दाखवलारतावर टीकेची झोड उठवणाऱया इम्रान खान किंवा पाकिस्तानबाबत भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.
1945 नंतरचे जग हे आजच्या काळापासून पूर्णपणे भिन्न आहे. संसाधने, संसाधने सर्व भिन्न होते. अशा परिस्थितीत जागतिक कल्याणाच्या भावनेने स्थापन झालेल्या संघटनेनेही कार्यप्रणालीमध्ये बदल केले पाहिजेत. सध्या आपण पूर्णपणे वेगळय़ा टप्प्यात आहोत. एकविसाव्या शतकातील गरजा आणि आव्हाने वेगळी आहेत, असे भाष्य करत संयुक्त राष्ट्र महासभेने परिस्थितीनुरुप बदलले पाहिजे असे मोदी म्हणाले.
कोरोना काळात केली इतर देशांना मदत
कोरोनाची साथ हे जागतिक संकट आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून आपण या कोरोनाशी लढा देत आहोत. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही आत्ममंथन करण्याची वेळ आहे. जागतिक संकटाशी लढा देण्यासाठी भारत वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहे. महामारीच्या या संकटातही भारताच्या वैद्यकीय कंपन्यांनी 150 हून अधिक देशांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा केला आहे. भविष्यातही भारताची लस निर्मिती आणि लस पुरवठा क्षमता संपूर्ण मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येईल’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
दहशतवादासह अवैधतेला विरोध
जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याची प्रति÷ा आणि याचा अनुभव आम्ही विश्वहितासाठी वापरू. आमचा मार्ग जनकल्याण ते जगकल्याण असा आहे. भारत नेहमीच शांती, सुरक्षा आणि समृद्धीसाठी आवाज उचलत राहील असे सांगत दहशतवाद, अवैध हत्यारांची तस्करी, ड्रग्ज, मनी लॉन्डरिंग यांच्याविरोधातील कारवाई यापुढेही अधिक बुलंद केली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारतात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहितीही दिली.
पाकच्या आरोपांनंतर भारताचे ‘वॉकआऊट’
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी ‘युएनजीए’मध्ये बोलले होते. यावेळी त्यांनी भारतावर कडक शब्दात टीका केली. आरएसएसने भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. 2002 च्या गुजरात दंगलीत बाबरी मशीद पाडली गेली आणि मुस्लिमांची हत्या झाली असा आरोपही करण्यात आला. काश्मीरमधून कलम 370 हटविणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. इम्रान खान बोलत असताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभागृहात उपस्थित असलेले भारताचे प्रतिनिधी तथा विदेश सेवा अधिकारी मिजिटो विनितो यांनी ‘वॉकआऊट’ केले.