प्रतिनिधी/ पणजी
सहकार क्षेत्रातील प्रत्येक संस्थेने ‘केविड पॅन्डेमिक आत्मनिर्भर भारत सहकार’ खाली येणाऱया योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास पुढील वर्षभरात 100 टक्के लोकांपर्यंत ही योजना पोहोचविणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
67 व्या सहकार सप्ताहानिमित्त राज्य सहकारी बँक आणि थ्रिफ्ट को ऑपरेटिव्ह असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सहकारी बँकेच्या पाटो मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख वक्ते नीलेश बोर्डे, सहकार उपनिबंधक रमेश गावकर, बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, थ्रिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, मार्केटिंग फेडरेशनचे विठ्ठल वेर्णेकर, तिसवाडी तालुका शिक्षक सह. सोसायटीचे सिताराम नाईक, वीज कर्मचारी सह. सोसायटीचे संदेश केरकर, कदंब कर्मचारी सह. सोसायटीचे रामा चोर्लेकर, खाण आणि उद्योग कर्मचारी सह. सोसायटीचे लक्ष्मीकांत तारी, गोवा एक्साईज कर्मचारी सह. सोसायटीचे प्रमोद जुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यकर्त्यांना सहकार क्षेत्राशी जोडावे : सावंत
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, सहकार क्षेत्रात किती उलाढाल झाली त्यापेक्षा किती कार्यकर्ते या क्षेत्राशी जोडले गेले व त्याद्वारे आत्मनिर्भर भारतच्या किती योजना लोकांपर्यंत ते फार महत्वाचे आहे. सहकार क्षेत्रात कोणते नविन उपक्रम हाती घेणार ही पुढील वर्षभराची संकल्पना ठेऊन त्या दिशेने कार्य करावे, असे सांगितले. आत्मनिर्भर भारत योजनेखाली, विशेष करून किसान क्रेडिट कार्ड दूध उत्पादकांसाठी प्रथमच 1.60 लाख रुपये व्याजरहित कर्ज उपलब्ध करून देण्यात आले त्यात राज्य सहकारी बँकेचे कार्य वाखाणण्या सारखे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्य सहकारी बँकेने आपल्या कार्याद्वारे पुन्हा एकदा लोकांचा विश्वास संपादन केला आहे. गृहआधार योजनेचे पैसे एटीएमद्वारे देण्यापेक्षा ते प्रत्यक्ष लाभार्थीच्या हाती पडतील यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही डॉ. सावंत यांनी केली.
सहकार क्षेत्रात दूरदृष्टीच्या नेतृत्वाची गरज : बोरडे
प्रमुख वक्ते बोरडे यांनी बोलताना सहकार क्षेत्रात दूरदृष्टीच्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ’स्वायत्तता आणि स्वतंत्रता’ या विषयावर ते बोलत होते. राष्ट्रीय बँकांनी स्वीकारलेले नॅटवर्किंग तंत्रज्ञान आता सहकारी बँकांनीही स्वीकारण्याचीही गरज व्यक्त करताना त्यांनी अमुल उद्योगाचे उदाहरण दिले. सहकार क्षेत्र नसते तर आज आम्ही आत्मनिर्भर बनणे शक्यच नव्हते. सहकारामुळेच कोरोना महामारीसारख्या काळातसुद्धा दूध, कडधान्य यांची कुणालाच चणचण भासली नाही, देशात सहकार क्षेत्र नसते तर केवळ शेतकऱयांनीच नव्हे तर आतापर्यंत अन्य कितीतरी सर्वसामान्य लोकांनीही आत्महत्या केल्या असत्या, असे ते म्हणाले.
सहकार हे एकच असे क्षेत्र आहे ज्याला सामाजिक बांधिलकी आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारे, निरपेक्ष भावनेतून चाललेले, लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेले, एकमेकां साह्य करू हे ब्रीद घेऊन चालणारे, असे हे क्षेत्र आहे. मात्र आज या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. त्यातून काहीअंशी असहकार निर्माण झालेला आहे, त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे, असे श्री. बोरडे पुढे म्हणाले.
राज्य सहकारी बँक 10.50 कोटी फायद्यात
श्री. फळदेसाई यांनी बोलताना, राज्य सहकारी बँक आता पूर्ण फायद्यात आली असून एनपीएसह सर्व नुकसानी भरून काढलेली आहे, असे सांगितले. सप्टेंबरपर्यंत ही बँक 10.50 कोटी रुपये फायद्यात असून राज्यातील सोसायटी आणि अपेक्स बँकांनाही नुकसानीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालल्याचे ते म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना बँकेच्या सुविधा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सहकार क्षेत्रातील योगदानासाठी विविध सोसायटय़ा आणि त्यांच्या अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल खरेदी न करू शकणाऱया 21 विद्यार्थ्यांना मोबाईल भेट देण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित सोसायटय़ांच्या अध्यक्षांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आरोग्य संचालनालय कर्मचारी सह. सोसायटीचे बाबलो वळवईकर यांनी आभार व्यक्त केले.