येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील 48 पैकी 45 आणि विधानसभेच्या 288 पैकी 200 जागा जिंकेल असा आत्मविश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत व्यक्त केला. जमिनीवरचे वास्तव काहीही असले तरी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी त्यांच्यापुढे खूपच कल्पक चित्र उभे करावे लागत असते. ते चित्र बावनकुळेंनी उभे केले असते तर गोष्ट वेगळी होती. भाजप फार पूर्वीपासून ‘शतप्रतिशत’ स्वप्न कार्यकर्त्यांना दाखवत आला आहे. सामान्य कुटुंब, छोटे जात समूह, इतर मागासवर्ग यांचे नेतृत्व करणाऱया छोटय़ा छोटय़ा कार्यकर्त्यांनी असंख्य यात्रा काढून, पूर्वी काँग्रेस विरोधात आणि 1999 नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात जनमत निर्माण केले. अभिजन वर्गातील नेतृत्वाने शहरी भागात जनतेचा आवाज मांडणारा पक्ष अशी प्रतिमा तयार केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या झुंजार नेतृत्वाची साथ लाभली आणि भाजप महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचला. बाळासाहेबांचे झंझावाती दौरे, लाखेंच्या सभा, सोबतीला गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेतृत्वाची संघर्ष यात्रा, माळी, धनगर आदी जाती घटकातील नेत्यांचे कष्ट या सगळय़ाचा परिणाम म्हणून 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार आले. मात्र या सत्ता काळानंतर दोन्ही पक्षांमधील प्रेम, जिव्हाळा आटला. 1990 च्या निवडणुकीत यशाने जेव्हा हुलकावणी दिली होती तेव्हा मंदिर प्रश्नापासून काँग्रेस सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपापर्यंत चिवट झुंज देऊन 95 साली ते सत्तेवर आले होते. तोपर्यंत राज्यातील सत्ता शिवसेनेने आणि केंद्रातील सत्ता भाजपने अशी त्यांची अलिखीत वाटणी होती. 99 ते 2014 या 5 वर्षात दोन्हीत दुरावा वाढला. केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी यांच्या कारकीर्दीत ही नाती बदलली. मोदी आणि शहांच्या काळात सत्तेचे शतप्रतिशत म्हणजे स्वबळावर सत्ता हे टार्गेट बदलले. विरोधक संपवून सगळीकडे आपलीच सत्ता, डबल-ट्रिपल इंजिन इथपर्यंत आता ते विस्तारले. मात्र या विस्ताराच्या अंतरंगात शतप्रतिशत भाजपचा असणारा कार्यकर्ता या सगळय़ातून कडेला फेकला गेला. जबाबदाऱया, महत्त्वाची पदे, आमदारकी, खासदारकी इतकेच नव्हे तर नगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंतची सगळी पदे आयात केलेल्या इतर पक्षीयांनी पटकावल्याची वस्तुस्थिती दिसते. पण तरीही याच लोकांसह भाजपला आपले म्हणून ‘हक्काचे’ घवघवीत यश संपादन करायचे आहे. त्यात वाटेकरी नको आहे. पक्षाची एक हाती सत्ता आणि तोंडी लावण्यापुरते मित्रपक्ष हा फॉर्म्युला 2014 पासून सुरु झाला. हळूहळू मित्र पक्षातील कार्यकर्ते भाजपकडे वळवले गेले. त्याचा फटका महादेव जानकर, राजू शेट्टी नंतर सदाभाऊ खोत, विनायक मेटे, मराठा महासंघ अशा सर्वांना बसला. मित्र पक्षाच्या या नेत्यांना एकटे बाजूला सारून त्याच पक्षाच्या दुसऱया नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण अधिकृतरित्या जाऊ लागले. जे सामील झाले त्यांची आधी आपल्या सोडलेल्या पक्षातील नेत्याशी झुंजून निम्मी शक्ती कमी झाली नंतर ठीक ठिकाणी भाजपच्या वरि÷ मंडळींनी दाबून ठेवण्याचे काम केले. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांचा खुबीने वापर केला. त्यांच्या कारखाने, बँका, सूतगिरण्या, शिक्षण संस्थांविरोधात याच मित्र पक्षाच्या नेत्यांनी पूर्वी भाजपसाठी दोन हात केले होते. भाजप नेत्यांनी त्याचे उट्टे काढण्याची संधी संस्थानिकांना दिली आणि इतकी वर्षे भाजपला साथ दिलेल्या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या तालुक्मयाच्या गावात मर्यादित करून टाकले. आता जेव्हा शिवसेना फोडली आणि शिंदे गट भाजपसोबत आला तेव्हा या मंडळींमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. कारण त्यांनी निवडणुकीत एकमेकाला आव्हान दिले होते. विशेष म्हणजे येत्या निवडणुकीत या सर्वांना भाजप किती जागा सोडणार आहे हे अद्याप निश्चित नाही. ते स्वतःच्या चिन्हावर लढणार की कमळ चिन्ह घ्यावे लागणार? हेही निश्चित नाही. मात्र आमच्या दोनशे जागा विधानसभेला निवडून येतील असे जेव्हा फडणवीस सांगत आहेत तेव्हा या मित्र पक्षांना स्वतःच्या चिन्हावर लढाईची मोकळीक मिळण्याची शक्मयता जवळपास नाहीच. आता वरि÷ भाजप नेतृत्वाने फडणवीस यांच्या या भूमिकेला छेद दिला तरच कदाचित पुढच्या निवडणुकीत ‘ढाल तलवार’ हे चिन्ह दिसू शकेल. अन्यथा त्यांनाही कमळा शिवाय पर्याय असणार नाही. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यापासून अनेक खासदारांच्या जागांवर भाजप दावा करत आहे. ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराची मुंबई महापालिकेप्रमाणेच चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी करून मुख्यमंत्री शिंदे यांना शह दिला आहे. अशा सगळय़ा घटना घडत असताना भाजप कार्यकारिणीने लोकसभेला 45 आणि विधानसभेला 200 जागांचे टार्गेट ठेवले असेल तर ते पूर्ण कसे होणार हा ही प्रश्न आहे. जो हक्काचा मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करत नव्हता ते मतदार भाजपमध्ये आले म्हणून त्याच उमेदवारांना स्वीकारण्यास तयार नाही हे गत निवडणुकीत दिसले. त्यात पुन्हा फुटीर शिवसेनेचीही भर पडली आहे. एका बाजूला सर्व्हे विरोधात असताना फडणवीस यांनी जो आत्मविश्वास व्यक्त केला आहे, तो मुश्कील असाच आहे. पण, त्यांची स्वतःःची काही गणिते असावित. त्यांनी अपेक्षित यश मिळवून दाखवले तर मात्र भविष्यात त्यांच्या नेतृत्वाला रोखणे भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांनाही शक्मय होणार नाही.
Previous Articleसात्विक वृत्तीचा मनुष्य सदोदित सुखसंपन्नच असतो
Next Article काँग्रेस-डावे त्रिपुराला उद्ध्वस्त करतील!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.