यमगर्णी येथील प्रकाराने नागरिक सुन्न : महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या
वार्ताहर / निपाणी
आपल्या मुलीनं शिकावं, शिकून मोठं व्हावं यासाठी आई-वडिलांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. मुलीनेही सुरुवातीला आई-वडिलांचे स्वप्न साकारण्याची जिद्द बाळगली. पण बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच अपयश व पालकांच्या अपेक्षाभंगाच्या भीतीने आपले जीवन संपविले. यानंतर कोणाची कसलीच तक्रार नसल्याने गावातील प्रमुख मंडळी व ग्रामस्थांनी पोलिसात वर्दी न देता दफनविधी केला व संबंधित कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना याची माहिती मिळाली. यानंतर दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून तेथेच विच्छेदन करण्यात आल्याचा प्रकार यमगर्णी येथे रविवारी घडला.
यमगर्णी येथील वनश्री लक्ष्मण अंबी (वय 19) या बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. यामुळे कुटुंबीय व ग्रामस्थांनी पोलिसात कोणतीच नोंद न करता मध्यरात्रीच दफनविधी पार पाडला.
आत्महत्या केलेल्या वनश्रीविषयी शोक व्यक्त करताना ती शिकत असणाऱया केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाला शनिवारी सुटी देण्यात आली. यामुळे निपाणीसह परिसरात आत्महत्येचे वृत्त वाऱयासारखे पसरले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी यमगर्णीत भेट देऊन पंचनामा करत आत्महत्येची घटना पोलिसात का नोंदविला नाही, असा सवाल केला. आत्महत्येनंतर आवश्यक तपासाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगत बसवेश्वर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक अनिता राठोड यांनी कुटुंबीयांची समजूत काढली.
यानंतर याप्रकरणी कोणती कार्यवाही करावी, यासंदर्भात निर्देश देण्यासाठी राठोड यांनी न्यायालयात निवेदन सादर केले. त्यानुसार न्यायालयाने प्रांताधिकाऱयांना निर्देश देत दफन केलेला मृतदेह काढून त्याचे विच्छेदन करून अहवाल देण्यास सांगितले. त्यानुसार प्रभारी प्रांताधिकारी प्रवीण जैन यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयास सूचना दिल्या. यानंतर उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांनी पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना घेऊन मृतदेह बाहेर काढला. यानंतर मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर वनश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सदर घटनेची नोंद बसवेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे.