‘नमस्कार मॅडम, तुमच्याजवळ खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मॅडम, आमच्या घरामध्ये मी, माझे पती आणि दोन मुलं अशी चारच माणसे. आम्ही दोघंही नोकरी करतो. घरामध्ये कशाचीच कमतरता नाही. अगदी छान हसतं-खेळतं आनंदी कुटुंबच म्हणा ना! परंतु एक विचित्र घटना घडली आणि आम्ही सारे हादरून गेलो. माझ्या मोठय़ा मुलाचे एका मुलीवरती प्रेम होते. तिने नकार दिल्याने त्याने स्वतःच्या आयुष्याचा दोर स्वतः कापून टाकला. ही घटना घडण्यापूर्वी मला कंटाळा आलाय गं आई. नकोच वाटतं सगळं असं म्हणायचा तो. मी त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण असं काही असेल याचा अंदाजच आला नाही. हे सारं आम्हाला नंतर कळलं पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यात दोष कोणाला देणार? तरुण मुलगा गमावल्याचे दु:ख, शोक. सारं प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवून.. काळजावर दगड ठेवून माझ्या धाकटय़ा मुलाला आणि मिस्टरांना सावरण्यासाठी मी उसने अवसान आणून उभी आहे. परंतु या सगळय़ातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे माझे पती आजही लोकांच्या चौकशी आणि हे घडलं कसं? आपल्याला आधी कळलं असतं तर ते थांबवता आलं नसतं का? आपण पालक म्हणून कुठे कमी पडलो आहोत का? हे असं झालंच कसं? या साऱया प्रश्नांनी अस्वस्थ आहेत. त्यांच्याशी बोलण्याची फार गरज आहे मॅडम.. प्लीज मदत करा.’ ती हमसून हमसून रडू लागली. पोटचा गोळा गमावल्याचे दु:ख शब्दांपलीकडचे होते. वरील उदाहरणातील घटनेप्रमाणे काळीज पिळवटून टाकणाऱया आत्महत्यांच्या अनेक घटना सातत्याने समोर येतात. नुकताच सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटेंची डॉक्टर नात शीतल हिच्या आत्महत्येने अवघा मराठी मुलुख हळहळला. केवळ तरुणच नव्हे तर कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने आत्महत्येच्या माध्यमातून जीवन संपवणे ही घटनाच भीषण आहे. तरुणांच्या आत्महत्यांची वाढती आकडेवारी मन विषण्ण करते. अगदी शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आत्महत्यांच्या वाढत्या आलेखाबाबत विचार करताना अनेक कारणे समोर येतात. बदलती जीवनशैली, अनिश्चितता, वाढती महागाई, जीवघेणी स्पर्धा, कौटुंबिक समस्या, नकारात्मकता, असफलता, नैराश्य, मानसिक आजार आदी अनेक कारणे समोर येतात.
खरंतर कुठलाही मृत्यू माणसाला शोकाकुल करतो परंतु स्वतःच्या हाताने जीवन संपवणे ही घटनाच करुण आणि भीषण आहे. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शोकाबरोबरच एक खंत भोगावी लागते. शेकडो विचारांचे वादळ त्यांच्या मनात घोंगावत राहते. त्याने किंवा तिने असे का केले असेल? काय होते नेमके? आमचे काही चुकले का? थोडा बोलला असता किंवा बोलली असती तर आम्ही त्याला वाचवू शकलो नसतो का? हे आणि असे असंख्य ‘का’ मनामध्ये फिरत राहतात. अस्वस्थ करत राहतात.
आत्महत्या का घडतात हे अभ्यासताना आजवर अनेक सिद्धांत मांडले गेले परंतु या सर्वातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. माणसाचे स्वतःशी असलेले नाते, स्वप्रतिमा किंवा जगाशी जुळलेले बंध या दोहोंपैकी एक नाते विचलित झाले की माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. आत्महत्येच्या मागील प्रत्यक्ष व तात्कालिक कारणांची यादी मोठी आहे आणि सर्वत्र ती सारखीच आढळते.
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या, अडचणी दु:ख असतेच. अनेकदा नको हे जगणे असा विचारही अनेकांच्या मनात येऊन जातो परंतु जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसे हा विचार क्षणार्धात झटकून टाकतात तर नकारात्मक भूमिकेमुळे काही व्यक्ती या विचाराशी खेळत राहतात. मनामध्ये हा विचार सतत घोळत राहतो आणि जगावे की मरावे या द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या व्यक्तीला त्यावेळी या विचारापासून परावृत्त करणारा मदतीचा हात मिळाला नाही तर आयुष्याची शोकांतिका होते.
आपल्या मनाची मशागत कशी झाली आहे, दृष्टिकोन कसा आहे यावर अनेक गोष्टी ठरत असतात. आपण माणसं आहोत म्हटल्यानंतर निराशाजनक प्रसंग, बऱया-वाईट घटना, जीवनाची वाटचाल करत असताना येणारे अनेक खाचखळगे या गोष्टी असणारच आहेत. आजचे स्पर्धात्मक युग, नवनवीन आव्हाने, नात्यांमधले बेबनाव, येणारे अपयश, त्यातून येणारे नैराश्य, विविध प्रकारचे ताणतणाव याकडे आपण कसे पाहतो आणि त्याला कसे सामोरे जातो यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. स्वतःचा समंजस स्वीकार, नकार देणे, नकार पचवणे, ताणतणावाचे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणे, नियमित व्यायाम, छंदांची जोपासना, स्वतःच्या मनात डोकावून पाहणे, स्वतःच्या मूडबाबत सजग असणे या साऱया ऊर्जादायी गोष्टीचा अवलंब करून आपल्या मनाचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक आहे.
कोणताही भावनातिरेक हा त्रासदायकच असतो. परंतु आपले विचार, भावना याकडे आपले लक्ष असेल अर्थात विचार आणि भावनांची सजगता असेल तर बऱयाच गोष्टी सोप्या होतील. प्री प्रंटल कॉरटेक्स अर्थात वैचारिक मेंदू सक्रीय राहून भावनिक मेंदूची अती सक्रीयता कमी करता येईल. मागच्या काही लेखात म्हटल्याप्रमाणे सकारात्मक दृष्टीकोनासोबतच भावनिक मोजपट्टीचा वापर करायला शिकणे आवश्यक आहे.
अशी भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची. यातील शून्य ही स्थिती (वाईटही नाही आणि चांगलेही नाही) अर्थात बॅलन्स स्थिती दर्शविते. यातील अधिक अंकाची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार-भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करून रोज मनात डोकावून पहायचे आणि आपली तुलना आपल्यासोबतच करायची. नोंद करायची. कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे, काही नकारात्मक भावना-विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच त्याची तीव्रता पाहता -1, -2 ही स्केल नैसर्गिक आहे. पण समजा -1 या पट्टीवर आहोत.. ओके. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत जात नाही ना, याकडे लक्ष हवे. एखादा विचार वारंवार मनात यायला लागला आणि त्याचे चिंतेत रुपांतर होऊ लागले तर आपण -3, -4 या स्केलवर जातो आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याची जाणीव आणि वेळीच घेतलेली खबरदारी यामुळे सतत वजा बाजूला राहणे म्हणजेच औदासिन्याच्या दिशेने होणारा प्रवास टाळता येईल. आपले मानसिक आरोग्य तपासण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे. 1. आपण स्वतःशी स्वस्थ आहोत का? 2. इतरांना आपल्या सहवासात स्वस्थ वाटते का? 3. आपल्यातल्या उणिवांचा शोध घेऊन त्या दूर करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत का? याची उत्तरे नकारार्थी आल्यास मानसिक आरोग्याबाबत अधिक सजग होत योग्य उपाययोजनेच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वतःकडे अशा पद्धतीने लक्ष दिल्यास मानसिक आणि पर्यायाने शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, हे मात्र निश्चित!!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583