प्रतिनिधी / मिरज :
शहरातील ख्वॉजा वसाहत येथे कर्जबाजारी आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून दाम्पत्याने आत्महत्या केलेल्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. उत्तरीय तपासणी अहवालात मयत पती सलीम गौससाहेब सय्यद उर्फ भटकल याने पत्नी मरीयम बशीर नदाफ उर्फ सय्यद हिचा गळा आवळून खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, महात्मा गांधी चौकी पोलिसांनी सलीम याच्यावर पत्नीच्या खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सावकारीच्या तगाद्यामुळे दाम्पत्याने आत्महत्या केली असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगितले जात असताना पोलिसांचा तपास मात्र भरकटल्याचे दिसत आहे.
मंगळवारी ख्वॉजा वसाहत येथे सलीम सय्यद आणि मरीयम नदाफ उर्फ सय्यद या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बचत गटांचा हफ्त्यांसाठी वाढता तागादा, पत्नीचे आजारपण आणि लॉकडाऊनमुळे बंद पडलेला पानपट्टीचा व्यवसाय आदी कारणास्तव सदर दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवल्याचे स्पष्ट झाले होते. पानपट्टीचा व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक विवंचनेतून सलीम हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होता. मंगळवारी हफ्त्याचा शेवटचा दिवस असल्याने त्याने अनेकांकडे पैसेही मागितले होते. मात्र, पैशांची जुळणा न झाल्याने दाम्पत्याने आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतूनच आत्महत्या झाल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार पोलिसात नोंदही झाली होती. सदर दाम्पत्यांपैकी सगळ्यात आधी कोणी गळफास घेतला? याबाबत तकवितर्क लढविले जात होते. उत्तरीय तपासणी अहवालात मात्र, सदर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
मयत सलीम सय्यद याने कर्जबाजारी आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून प्रारंभी पत्नी मरीयम हिचा गुलाबी रंगाच्या ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर सलीम याने स्वत आत्महत्या केली. असे उत्तरीय तपासणी अहवाल स्पष्ट झाल्याचे महात्मा गांधी चौकी पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी मयत मयरीम हिची मुलगी यासीन बशिर नदाफ (वय 25, रा. ख्वॉजा वसाहत) हिच्याकडून तशी फिर्याद दाखल करुन मयत सलीम याच्यावर भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत व्यक्तीवरच खूनाचा गुन्हा दाखल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. उत्तरीय तपासणी अहवालनुसार गुन्हा दाखल केल्याचे गांधी चौकी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.