एलऍण्डटी कंपनीचे दुर्लक्ष : गळती कायमची निवारण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. आदर्शनगर, वडगाव येथील पाणी गळती ही नित्याचीच आहे. महिनाभरानंतर पुन्हा एकदा पाण्याची गळती होत आहे. दररोज रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेकडो लिटर पाणी वाया जात असून त्याकडे एलऍण्डटी कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
आदर्शनगर येथे रस्त्यावर नेहमीच पाण्याची गळती लागते. जलवाहिनीची गळती न काढताच घिसाडघाईने रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे मध्यंतरी काँक्रिट फोडून गळती काढावी लागली होती. तरीदेखील काही महिन्यांनी पुन्हा गळती लागली. यामुळे उतारावरून पाणी वाहत आहे. वेगाने जाणाऱया वाहनांमुळे ये-जा करणाऱया नागरिकांवर पाणी उडत आहे. सततच्या पाणी गळतीने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ही पाणी गळती कायमची निवारण्याची मागणी करण्यात येत आहे.