आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता : प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त उपक्रमही राबविणार
प्रतिनिधी / कणकवली:
राज्यातील जिल्हा परिषदेच्या 300 शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सहा शाळांचा समावेश करण्यात आला होता. निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी 15 दिवसांमध्ये पुष्टी करण्याबाबत कळवावयाचे होते. दरम्यान, आता अंतिम यादीत जिल्हय़ातील नऊ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आदर्श शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय बाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहेत. अशा शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणही विकसित करणार
शिक्षणातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होणे हे आदर्श शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील अध्ययन फलनिष्पत्तीसह त्यांना सध्याच्या युगात विविध विषयांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी त्यांना विविध सहशालेय उपक्रमात (क्रीडा भाषण, लेखन-अभिनय, गायन व अन्य) प्राविण्य मिळवून देणारी तसेच विविध क्षेत्रातील कौशल्ये विकसित करणारी शाळा म्हणजे आदर्श शाळा, असे निश्चित करण्यात आले होते.
गुणवत्तेसह भौतिक, वैज्ञानिक, क्रीडा सुविधांवर भर
आदर्श शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय अशा भौतिक सुविधा, दळणवळणाचे रस्ते, भविष्यात विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यास इमारत व भौतिक सुविधांचा विस्तार करण्यास पुरेसा वाव असण्याची गरज आहे. या शाळांमध्ये पाठय़पुस्तकाच्या पलिकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील. विद्यार्थ्यांना व्यवस्थीतपणे लिहिता वाचता आले पाहिजे. वर्गात उभे राहून वाचन करण्यावर भर देणे गरजेच आहे. वाचनाचा सराव आवश्यक असून प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना त्यात वाचन, लेखन व गणितीय क्रीया अवगत होणे अनिवार्य असणार आहे.
मुल्यवर्धीत कौशल्य विकासावर भर देण्याचा निकष
नवनिर्मितीला चालना देणारे, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मुल्ये अंगी बाणविणे, सोबत काम करण्याचे कौशल्य, संभाषण कौशल्य यासारखी कौशल्ये जाणीवपूर्वक विकसित करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. निवडण्यात आलेल्या या आदर्श शाळा शक्यतो किमान पहिली ते सातवी वर्गाच्या जि. प. शाळा असणार आहेत. आदर्श शाळेत शिक्षकांची काम करण्याची इच्छा असेल तर तेथे 5 वर्षे काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे, वगैरे निकष ठरविण्यात आले आहेत.
अंतिम यादीत बदलासहीत शाळा वाढल्या
सिंधुदुर्ग जिल्हय़ातून या उपक्रमासाठी यापूर्वी निवड करत यादी अंतिम करण्यास आली होती. त्यात देवगड तालुक्यातील जामसंडे नं. 1, दोडामार्ग तालुक्यातील श्री सातेरी जि. प. केंद्रशाळा साटेली-भेडशी, कणकवली तालुक्यातील खारेपाटण नं. 1, कुडाळ तालुक्यातील पावशी नं. 1, वैभववाडी तालुक्यातील लोरे हेळेवाडी तर मालवण तालुक्यातील आचरा नं. 1 या शाळांचा समावेश होता.
दरम्यान, आता अंतिम निश्चित केलेल्या शाळांमध्ये पूर्वीच्या शाळांपैकी पाच शाळांचा समावेश आहे. यात जामसंडे नं 1, केंद्रशाळा साटेली-भेडशी, खारेपाटण नं. 1, पावशी नं. 1, लोरे हेळेवाडी या शाळांचा समावेश आहे. तसेच यादीत मालवण तालुक्यातील सुकळवाड, सावंतवाडी तालुक्यातील जि. प. शाळा चराटे, वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा नं. 1 व आडेली नं. 1 या शाळांचा समावेश करण्यात आला आहे. मागच्या यादीतील आचरा नं. 1 शाळा अंतिमच्या यादीतून वगळण्यात आली आहे.