शिवसेनेच्या बैठकीत नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक कामाला लागण्याचे दिले आदेश
प्रतिनिधी / सातारा
शिवसैनिक हा निष्ठावान असतो. तो भगव्यावर निस्सिम प्रेम करतो. आर्थिक कुमकवत असल्याने निवडणुकीत इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे उतरु शकत नाही, अशी खंत काही शिवसैनिकांनी व्यक्त करताच शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांना त्यांना चांगल्या शब्दात फटकारले. शासकीय आकडेवारी सांगू नका, निवडून किती जणांना आणणार ते सांगा, असे सुनावले. नंतर तुम्हाला वाटेल ती मदत करु, परंतु निवडणूक ताकदीने लढवा, असा मायेचा डोस दिला.
भगवतेसाई मंगल कार्यालयात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेनेची बैठक राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रा. नितीन बानुगडे पाटील, धैर्यशील कदम, जिल्हा प्रमूख जयवंतराव शेलार, यशवंतराव घाडगे, चंद्रकांत जाधव, डी.एम.बावळेकर, महिला संघटीका शारदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा प्रमुखांनी आढावा अगोदर मांडला नंतर तालुका प्रमुखांनी आपला आढावा सादर करताना खंत व्यक्त केली. तळागाळातील शिवसैनिक हा निष्ठावान आहे. भगव्यावर प्रेम करतो. परंतु खिशाने फाटका आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणूकीत तो निष्ठेने काम करतो, त्यास मदतीचा हात वरीष्ठांकडून मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली.
त्यावरुन मंत्री शंभूराज देसाई यांनी कडक शब्दात फैलावर घेतले. ते म्हणाले, आकडेवारीसाठी तुम्हाला बोलवलं नाही, काय नियोजन केले ते सांगा, सरकारी आकडेवारी आमच्याकडे आहे, शिवसेनेची ग्रामपंचायत निवडून आणली पाहिजे. हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे.शिवसेनेच्या ताब्यात ग्रामपंचायत आल्या पाहिजेत अजून तीन आठवडे आपल्या हातात आहेत, थोडस आंग झटकून काम करा. नुसत पद घेतले म्हणून चालणार नाही.
पदाला शोभेल असे काम करा, अशा शब्दात फटकारले. त्यांच्यानंतर प्रा. नितीन बानुगडे-पाटील कार्यकर्त्याना उद्देशून म्हणाले, एवढी वर्ष तुम्ही त्या पदावर आहात तुम्ही ग्रामपंचायत देऊ शकता. शिवसेना म्हणून लढायचं, काय ताकद आहे, ती दाखवायची. पक्षांने तुम्हाला प्रत्येकवेळी दिलेलं आहे. कसली कारण दरवेळी देता, विधानसभेला ना लोकसभेला, मला कारण अपेक्षित नाहीत.
राज्यात एक नंबरला शिवसेनाच असली पाहिजे. या ग्रामपंचायत झाल्यावर अहवाल घेण्यात येईल पदावर राहायच आणि काम करायचं नाही. ही गद्दारी आहे, सरळ बाजूला व्हा, पक्षाच्या नुकसान करू नका, अशा शब्दात त्यांनीही फटकारले. नंतर मात्र दोन्ही नेत्यांनी मायेने उपस्थित कार्यकर्त्यांना शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. या एका वाक्यावर वातावरण बदलणार आहे. तुम्हाला कोणी दादागिरी वा दम दिला तर दुसऱ्या मिनिटाला सांगा, पोलीस खात्याकडून अन्याय होणार नाही, परंतु कामाला लागा, शिवसेनेच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती आणायच्या आहेत, असा उपदेश दिला.