बार्शी / प्रतिनिधी :
सध्या कोरोनाणमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी काही विशेष बस सेवा चालू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. त्यात शनिवार दिनांक 9 मे रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महामंडळाने याबाबत आदेश जारी केले आहेत. मात्र याविषयी कोणताच आदेश बार्शी आगार पर्यंत पोहोचला नाही त्यामुळे लेखी आदेश आल्याशिवाय एक ही बस बार्शीतून धावणार नाही. असे बार्शी आगाराचे प्रमुख मोहन वाकळे यांनी दैनिक तरुण भारत संवाद शी बोलताना सांगितले.
सध्या देशभर लॉकडाऊन ची परिस्थिती असल्यामुळे बार्शीत आणि सोलापूर जिल्ह्यात बाहेर राज्यातील आणि बाहेर जिल्ह्यातील अनेक नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या इच्छित स्थळी किंवा आपल्या घरी पोहोचण्यासाठी एसटी सेवेची नितांत गरज आहे. तरी या नागरिकांनी किंवा मजुरांनी आपली नोंदणी जिल्हा अधिकारी यांच्या वेबसाईटवर किंवा आपल्या तहसील प्रशासनाकडे नावे नोंदवावीत असे आवाहन केले आहे. मात्र ही नावे नोंदवताना आपल्या परिसरात असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातून किंवा खाजगी नोंदणीकृत डॉक्टरांकडून आपले फिटनेस सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे. अशा नोंदणी झालेल्या नागरिकांना किंवा मजुरांना बाहेर जिल्ह्यात किंवा बाहेर राज्यात पाठवण्यासाठी एसटीची मदत घेतली जाणार आहे. मात्र यावेळी एका बसमध्ये फक्त वीस नागरिकांना नेता येणार असून त्यांना टप्पा प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या प्रवासात नागरिकांना कुठेही उतरता येणार नाही. तसेच त्यांना फक्त आपल्या अंतिम स्थानकापर्यंत त् पोहोचवण्याची जबाबदारी एसटीवर आहे . मात्र अजूनही बार्शी आगारात अशा कोणत्याही प्रकारचा आदेश आलेला नाही तरीही बार्शी बस स्थानकात किमान चाळीस बस गाड्या तयारीत ठेवण्याचे आगाराचे उद्दिष्ट असून तशी कार्यवाही चालू झाली आहे. यावेळी पुढे बोलताना आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी सांगितले की बार्शी स्थानकात रोज नागरिक फोन करून चौकशी करत आहेत. नागरिकांच्या या अडचणीच्या काळात बार्शी आगार त्यांना सर्वतोपरी सेवा देण्यास खंबीर असून याबाबतचा आदेश आला की ताबडतोब त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. या संकटात नागरिकांनी एसटी महामंडळाला सहकार्य करावे अशी विनंती बार्शी आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी केले आहे