अन्न-नागरी पुरवठा खात्याने ई-केवायसी बंधनकारक केल्याने गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक वन कार्यालयात पाणीपट्टी, घरपट्टी यासह आता आधारकार्ड दुरुस्तीच्या कामालादेखील प्रारंभ झाला आहे. त्यामुळे कार्यालयात आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी नागरिकांची वर्दळ वाढत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या कामासाठी आधारकार्डची गरज आहे. मात्र अनेकांच्या आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर नसल्याने दुरुस्तीसाठी कर्नाटक वन कार्यालयात गर्दी करत आहेत.
शहरातील अशोकनगर, गोवावेस, टीव्ही सेंटर आणि रिसालदार गल्लीतील कर्नाटक वन कार्यालयात आधारकार्ड दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान, आधारकार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख व मोबाईल क्रमांकात बदल करणे आदी दुरुस्तीची कामे कार्यालयात केली जात आहेत. रिसालदार गल्ली येथील कार्यालयात वीजबिल, दूरध्वनी बिल, घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच आधारकार्ड दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने येथील कर्मचाऱयांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी रिसालदार गल्लीतील कार्यालय वगळता इतरत्र असलेल्या कार्यालयात जाऊन आधारकार्ड दुरुस्तीची कामे करून
घ्यावीत.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. मात्र बऱयाच जणांच्या आधारकार्डमध्ये चुका दिसून येतात. त्यामुळे ते शासकीय कामासाठी ग्राहय़ धरले जात नाहीत. त्यामुळे आधारकार्डातील चुका दुरुस्त करून नवीन आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचे काम कर्नाटक वन कार्यालयात सुरू आहे.