चुका दुरुस्तीसाठी आधार नोंदणी केंद्रांवरही गर्दी : मुख्य पोस्ट कार्यालयांमध्ये दररोज 50 आधारकार्डसाठी नोंद
प्रतिनिधी /बेळगाव
कोणतीही योजना असो वा कागदपत्र आधार क्रमांक हा अनिवार्य आहे. आधार क्रमांकावरच अनेक कामे सुलभ होत आहेत. परंतु अनेकांच्या आधारकार्डवर चुका असून त्या दुरुस्त करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. नागरिकांना आधार नोंदणी केंद्रांबद्दल माहिती नसल्याने शहरातील पोस्ट कार्यालयात गर्दी करत आहेत. परंतु अन्य ठिकाणीही आधार नोंदणी केली जात असून त्याठिकाणी नागरिकांनी आपली कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे.
आधार क्रमांक महत्त्वाचा असल्यामुळे सुविधा केंद्रातून अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जात आहेत. एका आधार नोंदणीसाठी 800 ते 1000 रुपये घेण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे पोस्ट कार्यालयांमध्ये 50 ते 100 रुपयांमध्ये आधार नोंदणी केली जात असल्यामुळे नागरिकांकडून प्रथम प्राधान्य दिले जात आहे. यामुळे पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणीसाठी गर्दी होताना दिसत आहे. बेळगाव, खानापूर अशा मुख्य पोस्ट कार्यालयांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत नोंदणी केली जात आहे. लहान पोस्ट कार्यालयांमध्ये दुपारनंतर नोंदणी करण्यात येत आहे.
मोबाईल ऍपद्वारे पोस्टमन करू शकतात अपडेट
बऱयाच नागरिकांनी आधार नोंदणी करताना दिलेले मोबाईल क्रमांक सध्या बंद आहेत. मोबाईल बंद असल्यामुळे ओटीपी येण्यास अडचणी येत आहेत. केवळ मोबाईल क्रमांक अपडेटसाठी नागरिकांना दिवसभर नोंदणी केंद्रावर गर्दी करावी लागत आहे. हे टाळण्यासाठी पोस्ट विभागाने मोबाईल ऍपद्वारे मोबाईल क्रमांक अपडेट करण्याच्या सुविधेला सुरुवात केली. पोस्टमनकडे उपलब्ध मोबाईलच्या साहाय्याने कोठूनही मोबाईल क्रमांक अपडेट केला जाऊ शकतो. यासाठी पोस्टमनला 50 रुपये द्यावे लागणार आहेत.
या पोस्ट कार्यालयांमध्ये नोंदणी सुरू…
कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालय, दूरदर्शननगर, मारुती गल्ली, टिळकवाडी, हिंदवाडी, एमएलआयआरसी, शिवाजीनगर, शहापूर, वडगाव, हिंडलगा, पिरनवाडी, सांबरा, बाळेकुंद्री, खानापूर, लोंढा, नंदगड या पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केली जात आहे. यातील मुख्य पोस्ट कार्यालयांमध्ये दररोज 50 तर उर्वरित कार्यालयांमध्ये रोज 10 ते 15 आधार नोंदणी केली जात आहे.