बेळगाव वन कार्यालयामध्ये लुटीचा प्रकार : जिल्हाधिकाऱयांनी चाप लावण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वच ठिकाणी उपयुक्त ठरणारे ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड. या आधारकार्डसाठी अनेकांचे हात ओले करावे लागत आहेत. बेळगावमध्ये नागरिकांना सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या ‘बेळगाव वन’ या कार्यालयातच आधार नोंदणीसाठी 200 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात असून याकडे जिल्हाधिकाऱयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नागरिकांना सर्व सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने बेळगाव वन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शहरात गोवावेस, रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर, अशोकनगर व बिग बाजार येथे कार्यालये सुरू आहेत. रिसालदार गल्ली येथील कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने दररोज शेकडो नागरिक या ठिकाणी येतात. तहसीलदार कार्यालय असल्याने ग्रामीण भागातील नागरिकही या-ना-त्या कारणाने या ठिकाणी येतात. याच गर्दीचा फायदा घेत काहीजण आधार नोंदणीसाठी 200 रुपये आकारत आहेत.
बेळगाव शहर तसेच परिसरात पोस्ट विभागाच्यावतीने 50 रुपयांमध्ये आधार नोंदणी केली जात आहे. परंतु बेळगाव वनमध्ये 200 रुपये आकारून सर्वसामान्यांची लूट करण्याचे प्रकार घडत आहेत. दररोज 25 ते 30 आधार नोंदणी केली जात असल्याने प्रत्येक आधार नोंदणीमागे 100 रुपये वसूल केले तरी दोन ते तीन हजार रुपयांची वरकमाई कर्मचारी करत आहेत. त्यामुळे कर्मचारी मालामाल होत असून नागरिक मात्र भरडले जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच चाप बसविणे आवश्यक आहे.
आर्थिक पॅकेजमुळे भासतेय गरज
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बंद झाला. अशा व्यक्तींकरिता राज्य सरकारने विविध प्रकारचे पॅकेज जाहीर केले. या सर्वांना सेवासिंधूमधून नावनोंदणी करावी लागत आहे. ही नोंदणी करताना आधारकार्ड क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. आधारकार्डवरील पत्ता, फोटो, नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक योग्य असणे आवश्यक आहे. परंतु बऱयाच नागरिकांच्या आधारकार्डवर चुका असल्याने दुरुस्तीसाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे. त्यामुळे अधिकचे पैसे खर्च करूनही आधार नोंदणी करण्याचे प्रकार घडत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांची कर्मचाऱयांकडून लूट – मेघन लंगरकांडे (नागरिक)
आधारकार्डमधील दुरुस्तीसाठी सोमवारी रिसालदार गल्ली येथील बेळगाव वन कार्यालयात गेलो होतो. त्या ठिकाणी 200 रुपयांची मागणी करण्यात आली. परंतु मी जाब विचारल्यानंतर 150 रुपये घेऊन आधार नोंदणी करण्यात आली. ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत कर्मचारी लूट करीत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.