प्रतिनिधी / बेळगाव
अलीकडेच सर्व कामकाज सुरळीत सुरू झाल्याने रखडलेली कामे करून घेण्यासाठी नागरिकांची धापवळ सुरू आहे. आधारकार्डातील चुकांची दुरुस्ती करून घेण्यासाठीही नागरिक धावपळ करीत आहेत. काही ठिकाणी नागरिकांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन आधारकार्डामधील दुरुस्तीसाठी जादाची रक्कम वसूल करण्याचा सपाटा चालविला असल्याची तक्रार होत आहे.
कोरोनाच्या प्रसारामुळे सर्वच कामकाज ठप्प झाले होते. यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली होती. सरकारी कार्यालयांसह सर्व कामकाज रखडले होते. रेशनकार्डातील चुकीची दुरुस्ती, आधारकार्डातील चुकांची दुरुस्ती तसेच नवीन रेशनकार्ड यासह महापालिकेतील विविध कामकाज कोरोनामुळे रखडले होते. पण अनलॉक झाल्याने कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. तरी देखील कोरोनाचा प्रसार वाढत चालल्याने गर्दी टाळून कामकाज करण्यावर भर देण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक सरकारी कार्यालयांसह ओळखपत्रातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी घराबाहेर पडत नव्हते. काही ठिकाणी आधार ओळखपत्राची गरज भासत असल्याने चुकांची दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे. याकरिता बेळगाव वनसह खासगी कॉम्प्युटर सेंटर्सवर व काही बँकांमध्ये गर्दी होत आहे.
काही कॉम्प्युटर सेंटर्सवर आधार ओळखपत्र अपडेट करण्यासाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी जादाची रक्कम घेऊन ठरावीक ठिकाणी पाठविण्यात येत आहे. बँक व कॉम्प्युटर सेंटर चालकांच्या संगनमताने जादाची रक्कम घेऊन तातडीने आधार ओळख पत्रातील दुरुस्तीचे काम करून देण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. याकरिता 300 ते 500 रुपये आकारण्यात येत असून नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. जादाची रक्कम दिली नसल्यास आधार ओळखपत्र दुरुस्तीसाठी दोन दिवसांनंतर देण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यामुळे आधार ओळखपत्रातील चुकांची दुरुस्ती आणि आधार ओळखपत्र अपडेट करण्यासाठी बेळगाव वन कार्यालयातच जादा संगणक उपलब्ध करून नागरिकांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.