जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, 23 ऑक्टोबरपर्यंत शिधापत्रिकाधारकांनी आधारसिडींग करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार सिडींग करण्यात येणार आहे. रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील e-KYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी बुधवारी दिली. 23ऑक्टोबर पर्यंत आधार सिडींग न झालेल्यांचे धान्य पुढील महिन्यापासून बंद करण्या येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
23 ऑक्टोबरपूर्वी प्रत्येक लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तीचे 100 टक्के आधार सिडींग आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. तरी नियमित धान्य मिळणार्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तीचे आधार क्रमांकाचे सिडींग करण्यात आले नाही. त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे आणि सिडींग पूर्ण करून घेण्यात यावे. आधार सिडींग करण्यात काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी यांच्याशी संपर्क साधावा. 23 ऑक्टोबरपूर्वी आधारसिडींग न करणार्यांचे धान्य पुढील महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. संबंधितांनी शिधापत्रिका आधार सिडींग केल्यास त्यांना धान्य पुर्ववत मिळणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांनी कळविले आहे.