प्रतिनिधी/ पणजी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून राज्यात जशी काही सोहळ्यांची मालिकाच सुरु झाली असून त्यानिमित्त देश-विदेशातून येणारे अतिमहनीय व्यक्ती आणि पर्यटक यांचा अखंड ओघ गोव्याकडे लागल्यामुळे येथील रस्त्यांना श्वास घेणेही मुश्किल बनले आहे. राज्याच्या प्रत्यक्ष लोकसंख्येच्या सरासरी तीनपट अधिक लोक आणि त्यांची हजारोंच्या संख्येने येणारी वाहने यांच्या गर्दीत स्थानिक हरवून गेला आहे. त्यातल्या त्यात किनारी भागातील स्थानिकांची तर अधिकच गोची झाली असून स्वतःच्याच भागात परके बनावे अशा स्थितीत ते पोहोचले आहेत.
नोव्हेंबरच्या दुसऱया पंधरवडय़ापासून राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळीच सुरू झाली आहे. त्यात इफ्फी, आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव, किनारे स्वच्छता मोहीम, जागतिक आरोग्य परिषद, मोप विमानतळाचे उद्घाटन, सेरेंडिपीटी महोत्सव यासारख्या कार्यक्रमांचा समावेश होता. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेते, अन्य अतिमहनीय व्यक्ती, देश-विदेशातील चित्रपट सितारे, तंत्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि लाखोंच्या संख्येने पर्यटक यांची वर्दळ जबरदस्त वाढली आहे. या मालिकेत नववर्षारंभापर्यंत आणखीही अनेक कार्यक्रमांची भर पडणार असून गर्दीचा ओघ संपता संपेना अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे राजधानीसह राज्याच्या प्रत्येक प्रमुख शहरात आणि किनारी भागात प्रवासी आणि पर्यटकांचा महापूर यावा असे चित्र दिसत आहे. पणजीतून म्हापसा हे अंतर 12 ते 13 किमी एवढे असून जेमतेम 20 मिनिटात ते पार करता येणे शक्य आहे. परंतु सध्या या मार्गावर दिवसभर वाहनांची एवढी अफाट गर्दी असते की तब्बल दीड तासातसुद्धा ते पार करणे शक्य होत नाही.
आश्चर्यकारक आणि तेवढाच संतापजनक प्रकार म्हणजे वाहतूक खाते किंवा वाहतूक पोलीस यांनी हा संपूर्ण मार्ग देव आणि दैवाच्या हवाली केला आहे. या मार्गात कुठेच पोलीस किंवा वाहतूक अधिकारी औषधालासुद्धा सापडत नाहीत. त्यामुळे वाहतुकीत अतिरेकी बेशिस्तपणा वाढला आहे. रेन्ट अ बाईक व कार यांच्या अरेरावीला तर घरबंदच राहिलेला नाही. त्याशिवाय खासगी दुचाक्या आणि कार भाडय़ाने देण्याच्या व्यवसायानेही परमोच्च बिंदू गाठला आहे. त्यामुळे कोण पर्यटक आणि कोण स्थानिक हे ओळखणेही कठीण होऊन बसले आहे.
अशी वाहने चालविणारे पर्यटक एका वेगळ्याच विश्वात वावरत असल्यागत वावरत असतात. गोवा म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’, असे ‘खुल्लम खुल्ला’ वावरण्याचे राज्य, येथे सर्वकाही खुलेआम चालते-उपलब्ध होते, अशीच काहीशी भावना बनवून ते गोव्यात आलेले असतात. त्यातूनच अनेकांना स्वतःच्या कपडय़ांचेसुद्धा भान राहिलेले नसते. एखाद्या सद्वर्तनी व्यक्तीने शरमेने मान खाली घालावी अशा ‘अर्धनग्न’ म्हणण्यासारख्या स्थितीत (खास करून महिला) ते या देवभूमीत वावरत असतात. त्यांना कुणाचेही काहीच सोयरसुतक वाटत नसते.
अशा अंदाधुंद पर्यटकांच्या वाहनांमुळे अनेकदा वाहतुकीचाही खोळंबा होत असतो. परंतु पोलिसांच्या नावाने बोटे मोडण्यापलीकडे कुणाच्याही हाती काहीच नसते. या खोळंब्यात कैकवेळी रुग्णवाहिकाही तासनतास अडकतात. ज्याचे दैव चांगले तोच गोमेकॉत पोहोचतो व उपचार होतात, काहीजण गाडीतच गचकतात असेही प्रकार घडले आहेत.
दरम्यान, नुकताच उद्घाटन झालेला मोप विमानतळ अद्याप कार्यरत झालेला नाही म्हणून म्हापसा-पणजी रस्त्याची एवढी स्थिती आहे. एकदा हा विमानतळ सुरू झाला म्हणजे हा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा ठरणार आहे. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असेल हे चित्र आताच स्पष्ट होत आहे. पर्वरीत लवकरच फ्लायओव्हरचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. परंतु तो प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यास किमान पाच वर्षे लागणार आहेत आणि मोपवरून कोणत्याही क्षणी वाहतूक होऊ शकते, अशी तयारी आहे. त्यानंतर पणजी-म्हापसा रस्त्यावरून प्रवास? नको रे बाबा! असे म्हणण्याची पाळी न आली म्हणजे मिळवली, असेच म्हणावे लागेल.