कोरोनामुळे दिवसाला फक्त 15 हजार भाविकांना मंदिरात प्रवेश, तिरुपती देवस्थानचा निर्णय
कोल्हापूरच्या भाविकांना घालावी लागणार प्रवास आणि दर्शनाची सांगड
धीरज बरगे / कोल्हापूर
तिरुपती बालाजी दर्शनासाठी निघालाय… मग अगोदर दर्शनासाठीचे बुकींग निश्चित करा, त्यानंतरच तिरुपतीसाठी मार्गस्थ व्हा. कारण असे आहे की, कोरोना पार्श्वभूमीवर तिरुपती देवस्थानने दिवसाकाठी दर्शन रिझर्व्हेशन केलेल्या केवळ 15 हजार भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर्शन बुकींगशिवाय तिरुपतीवारी केल्यास दर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रवास आणि दर्शन बुकींगची सांगड घालून कोल्हापुरमधील भाविकांना प्रवास करावा लागणार आहे.
तिरुमल्ला (आंध्रपदेश) येथे तिरुपती देवाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे तिरुपती डोंगर कायमच भाविकांच्या गर्दीने फुलन गेलेला असतो. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर सहा महिने मंदिर भाविकांसाठी बंद होते. गेल्या दोन महिन्यांपासून ट्रस्टने मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले आहे. त्यामुळे तिरुपती येथे पुन्हा भाविकांची गर्दी होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिवसाकाठी केवळ 15 हजार भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात सोडण्याचा निर्णय तिरुपती देवस्थानने घेतला आहे.
नवरात्रौत्सवामध्ये तिरुपतीहून करवीर निवासिनी अंबाबाईला प्रतिवर्षी शालू येतो. ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे कोल्हापूर-तिरुमल्लाचे तसे जिव्हाळ्याचे नाते आहे. यामुळे कोल्हापूरहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. दर्शन खुले झाल्याने तिरुपतीकडे अनेक भाविकांची पाऊले वळू लागली आहेत. मात्र तिरुपतीला जाण्यापूर्वी दर्शन बुकींग केल्यास मंदिरात प्रवेश मिळवणे भाविकांना सहज शक्य होणार आहे.
बुकींगची घालावी लागणार सांगड
तिरुपती-कोल्हापूरला जोडणाऱ्या हरिप्रिया एक्स्प्रेस रेल्वेगाडीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. दिवसाआड कोल्हापूरमधून सकाळी साडेआठ वाजता ही एक्स्प्रेस तिरुपतीसाठी मार्गस्थ होते. रेल्वेने प्रवास करण्यासाठीही सध्या अगोदर तिकीट आरक्षित करावे लागते. ऐनवेळी रेल्वेमध्येही प्रवेश दिला जात नाही. तसेच तिरुपती डोंगरावरही दर्शन बुकींगशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे तिरुपती दर्शन आणि रेल्वे तिकीट आरक्षणाची सांगड घालून भाविकांना तिरुपती प्रवास करावा लागणार आहे.
टोकन असेल तरच प्रवेश
तिरुपती दर्शनासाठी ऑनलाईन आणि तिरुमल्ला डोंगर पायथ्याला बुकींगसाठीची सुविधा उपलब्ध आहे. व्हॅलिड दर्शन तिकीट (टोकन) असल्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तिथे जाऊन टोकन घेतल्यास 15 हजार भाविकांची संख्या पूर्ण झाली असेल तरच दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा भाविकांना करवी लागणार आहे.
अंबाबाई मंदिरातील बुकींग सुविधा बंद
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामधूनही तिरुपती बालाजीचे दर्शन बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने ही बुकींग सुविधाही बंद आहे. त्यामुळे भाविकांना ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जागेवर जाऊन बुकींग करावे लागणार आहे.