सध्याच्या कोरोनाच्या काळात लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारणरीत्या वाढले आहे. कोणीही लसीकरणाविना राहू नये यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनानेही कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांच्या सहकार्यावरच त्यांच्या प्रयत्नांचे यश अवलंबून आहे.
याच संदर्भात राजस्थानच्या जोधपूर शहरामध्ये सध्या एका वधूची चर्चा जोरात होत आहे. येथील एक रहिवासी मानवेंद्र सिंग यांचा गेल्या गुरुवारी विवाह झाला. त्यांच्यावधूचे नाव सुमन कंवर असे आहे. लग्न लागल्यानंतर आपल्या सासरच्या घरी जाण्याऐवजी सुमन कंवर यांनी आपल्या पतीसह विवाहस्थळाजवळील लसीकरण केंद्र गाठले. सुमन आणि मानवेंद्र सिंग यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र, दुसरा घेण्याचे राहिले होते. लसीकरण केंद्रात जाऊन त्यांनी स्वतः लसीचा दुसरा डोस घेतला आणि आपल्या पतीसही घ्यायला लावला. त्यानंतर त्यांची वरात लसीकरण केंद्रापासून त्यांच्या सासरच्या घरापर्यंत काढण्यात आली.
लग्नाच्या वेशभूषेतच जेव्हा हे वधूवर लसीकरण केंद्रात पोहोचले तेव्हा तेथील कर्मचाऱयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नवविवाहित दांपत्य घरी न जाता प्रथम केंद्रात लसीकरणासाठी आले आहे, असे समजल्यानंतर कर्मचाऱयांचे त्यांचे कौतुक वाटले आणि लसीकरणाची वेळ संपत आलेली असतानाही त्यांनी त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली. लसीकरण झाल्यावर कर्मचाऱयांनी त्यांना छोटीशी भेटवस्तूही दिली आणि कौतुकाने निरोप दिला. लसीकरणासंबंधी इतकी जागरुकता दाखविल्यामुळे सुमन कंवर यांची पंचक्रोशीत प्रशंसा होत आहे.