प्रतिनिधी / कोल्हापूर
सामाजिक काम, समाजाच्या कल्याणांपर्यंत पोहचविणे हेही मोठं काम आहे. महाराष्ट्राचा कृषी-औद्योगिक विकास हा यशवंतरावांच्या आचार-विचारांमुळे घडून आला आहे. ते सुसंस्कृत राजकारणी आणि सुहृदयी साहित्यिक होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक, शाहूकार डॉ. रमेश जाधव यांनी काढले. ते स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा उभारणी कार्यातील शिलेदारांच्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीराम ज्ञानपीठाचे संस्थापक बी.ए. पाटील होते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा उभारणी कार्यातील शिलेदारांचा कै. सौ. हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशन, कोल्हापूरतर्फे सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूरचे अध्यक्ष विजयसिंह पाटील, संभाजीराव पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे आदींचा समावेश होता. सत्कार समारंभ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. जाधव यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे मानद कार्यवाह प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले. सत्कारमूर्तींतर्फे संभाजीराव पाटील तसेच संभाजीराव जगदाळे, बी.ए. पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. पद्मजा पवार, राजवर्धन यादव, प्रकाश आमते, उदय गायकवाड, पांडुरंग माळी, प्रा. दिग्विजय पवार आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी आभार मानले.