रस्ते, ड्रेनेज, गटारी पावसाळय़ापूर्वी बांधणे गरजेचे : 14 फुटांचा नालाच गायब : नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोणतेही काम करण्यासाठी आराखडा तयार केला जातो. त्यानुसार निधी उपलब्ध केला जातो. याचबरोबर काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादाही ठरविली जाते. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱया कामांसाठी कालमर्यादाच ठरविण्यात आली आहे की नाही असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे. आनंदनगर ते अनगोळ रस्त्याच्या कामाला गेल्या चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मात्र हा रस्ता तसाच पडून आहे. याला कोण वाली आहे की नाही? असा प्रश्न आता साऱयांनाच पडला आहे. याचबरोबर आनंदनगरवासियांना गेल्या 25 वर्षांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भाग्यनगरपासून येळ्ळूर रस्त्याकडे आलेला तब्बल 14 फुटांचा नालाच गायब झाला आहे.
पावसाळय़ात दरवषी अनेक घरांमध्ये पाणी शिरते. गटारी नाहीत, रस्ता नाही, डेनेजची समस्या नेहमीचीच आहे. अनेक रस्त्यांवर नुसतीच खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आनंदनगरवासियांचा आनंद हरपला आहे. नाव आनंदनगर मात्र नेहमीच दुःखाच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. शहरात राहून आपल्या मुलांना चांगले शिक्षण, स्वतःची नोकरी आणि काम करून चांगले जीवन जगण्याच्या आशेने बाहेरून आलेल्या या नागरिकांना या समस्यांमुळे शहरच नको म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आनंदनगरमधील बराच भाग एनए लेआऊट असून त्याला लागूनच अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. आनंदनगरला 20 ते 25 वर्षे उलटली आहेत. मात्र येथील समस्या जैसे थे आहेत. महापालिका आणि लोकप्रतिनिधी याकडे कधीच गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. यामुळे आपण न्याय तरी कोणाकडे मागायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
आनंदनगरपासून भाग्यनगर, अनगोळकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खोदाई करून ठेवण्यात आला आहे. नाल्यावर पाईप घालण्यासाठी चर देखील मारून ठेवण्यात आली आहे. ही सर्व कामे करत असताना त्यांची गती कासवापेक्षाही कमी झाली आहे. किमान 10 वर्षांत तरी हा रस्ता पूर्ण होणार काय? असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे. आता वळीव पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी हा रस्ता पूर्ण होणार की यावषीही गुडघाभर पाण्यातूनच प्रवास करावा लागणार? असा प्रश्न साऱयांना पडला आहे.
मागीलवेळी या रस्त्यांवर पावसाळय़ात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या रस्त्यासाठी येथील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली. बऱयाच वर्षांनंतर आनंदनगर आणि भाग्यनगरला जोडणाऱया रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र काही दिवसांतच हा रस्ता खराब झाला. त्यानंतर आता पुन्हा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी वर्षभरापूर्वी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्यानंतर कंत्राटदाराने पाठच फिरविली आहे.
दरवषी पावसाळय़ात तर या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरत आहे. गटारी नसल्याने पाण्याला जाण्यासाठी वाटच नाही. यामुळे सर्वत्र पाणी साचून राहते. बऱयाच ठिकाणी अतिक्रमणही झाल्याने गटारीच नाहीशा झाल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी या नगरमधील रस्त्यांचे डांबरीकरण केले गेले. मात्र आता डांबरीकरण असलेला रस्ताच येथे सापडणे अवघड झाले आहे. अनेक रस्त्यांवर चरी मारुन ठेवण्यात आल्या आहेत. रस्त्याबरोबरच पाण्याची अवस्थाही गंभीर बनली आहे.
ड्रेनेजची डोकेदुखी कधी संपणार?
आनंदनगर म्हटल्यानंतर समोर येते ती प्रथम ड्रेनेजची समस्या. पहिला आणि दुसरा क्रॉसपर्यंतच्या रहिवाशांना महापालिकेने ड्रेनेज जोडणी करण्यासाठी परवानगी दिली होती. यामुळे केवळ तीन ते चार गल्ल्यांना ड्रेनेजची सोय करण्यात आली आहे. मात्र उर्वरित विभागात ड्रेनेजची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे रहिवासी सेफ्टीक टँक बांधून त्याला शौचालयाच्या पाईपची जोडणी करत आहेत. सेफ्टीक टँकमधील पाणी उघडय़ावर सोडले जाते. यामुळे काही ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. तेंव्हा उर्वरित रहिवाशांना ड्रेनेजच्या जोडणीला परवानगी द्यावी, अशी मागणी यापूर्वी अनेवेळा करण्यात आली आहे. मात्र पूर्वीचेच डेनेज ब्लॉक होत आहे. त्यामुळे मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वास्तविक आता ही डेनेज पाईप मोठी घालणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे अद्याप तरी गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ठिकठिकाणी पाणी पसरत आहे. यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. परिणामी मलेरिया, फ्लू, टायफाईड यासारख्या साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो. तेंव्हा पावसाळय़ापूर्वी या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
महापालिका वेळेत पाणीपुरवठा करत नसल्याने अनेकांनी विहिरींची खोदाई करून पाण्याची समस्या निकालात काढण्याचा प्रयत्न केला. पण या विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी जात असल्याने त्यामधील पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. विहिरींची खोदाई व बांधकामासाठी केलेला खर्च वाया गेला आहे. या ठिकाणी घरांसाठी काही जणांनी जागा खरेदी केली तरी ती 100 रुपयांच्या बॉण्डवरच जागा खरेदी केली गेली आहे. त्यांना विविध योजना देणे अवघड जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र महापालिकेने रितसर परवानगी दिली असून करदेखील महापालिका वसूल करते. तेंव्हा आम्हाला सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे. पावसाळय़ापूर्वी या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
कचऱयाची समस्याही गंभीर
या परिसरात अनेक रिकाम्या जागा असून त्या ठिकाणी नागरिक उघडय़ावरच कचरा फेकत आहेत. हा कचरा भटकी कुत्री विस्कटून टाकतात. यामुळे सर्वत्र कचरा पडल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. महापालिकेकडून कचराही वेळेत उचलला जात नाही. ज्या ठिकाणी कुंडी आहेत. पण त्यात कचरा योग्यप्रकारे टाकला जात नाही. हा कचरा जनावरे व कुत्री पुन्हा विस्कटू लागली आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. मात्र आता महानगरपालिकेतर्फे बऱयापैकी कचरा उचल होताना दिसत आहे.
नाल्याचा सर्व्हे होणे गरजेचे
सध्या नाल्यावर सिडीवर्कचे काम सुरू आहे. मात्र या नाल्याची रुंदी कमी झाली आहे. भाग्यनगरपासून येळ्ळूर रस्त्याकडे आलेला तब्बल 14 फुटांचा नालाच गायब झाला आहे. या नाल्याच्या जागेत अतिक्रमण करून अनेकांनी इमारती, घरांच्या संरक्षक भिंती उभ्या केल्या आहेत. यामुळे या नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात शिरत आहे. या संदर्भात महापालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन हे अतिक्रमण तातडीने हटविणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक इमारतींना या नाल्याच्या पाण्याचा धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नाल्याचा सर्व्हे करून केलेले अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे.