रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांचे हाल : काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत असून आनंदनगर ते अनगोळपर्यंतच्या संपर्क रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर रस्त्याचे काम अर्धवट असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. सदर रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे. सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वडगाव-अनगोळ संपर्क रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. याकरिता परिसरातील काही इमारती आणि अतिक्रमण हटविले आहे. काही ठिकाणची अतिक्रमणे अद्याप हटविली नाहीत. तसेच रस्त्याचे कामही रखडले आहे. काही ठिकाणी रस्त्याशेजारी खडी पसरण्यात आली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. परिसरातील पथदीप वारंवार बंद होत असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याचा विकास करून स्मार्ट रोड बनविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण सध्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.
वडगावहून अनगोळला जाण्यासाठी हा मार्ग सोयिस्कर आहे. त्यामुळे सर्रास वाहनधारक या रस्त्याचा अवलंब करीत असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. पण रस्ता खराब असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या विकासाकरिता डेनेज चेंबरची उंची वाढविली आहे. पण सदर चेंबर वाहनधारकांसाठी धोकादायक बनले असून अपघात घडत आहेत. चेंबर रस्त्यापेक्षा उंच असल्याने वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी चेंबर असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले असल्याने रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.