वेंगुर्ले / वार्ताहर-
आनंदयात्री वाड:मय मंडळाचे कार्य जवळून पाहाण्याचा योग आला. कोंडुरा कडयावरील आरती प्रभूंच्या साहित्यावरील झालेला कार्यक्रम तर केवळ अविस्मरणीय असाच आहे. आनंदयात्रीच्या संचालिका वृंदा कांबळी व सर्व कार्यकर्ते यांचा अमाप उत्साह ओसंडत असतो. देशाटन, थोरामोठयांचा सहवास आणि सभासंमेलने हे ज्ञान मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. आनंदयात्रीतील सहभागातून हे सर्व मिळते. असे गौरवोद्गार अध्यक्षपदावरून बोलताना अजित राऊळ यानी काढले.
वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाड:मय मंडळाच्या स्नेहमेळाव्याला अध्यक्षपदावरून ते बोलत होते. उत्साहपूर्ण वातावरणात आनंदात मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत व्यासपीठावर अध्यक्ष अजित राऊळ, प्रमुख पाहुणे सुधाकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन दळवी, सातेरी प्रासादिक संघाचे राजाराम नाईक, लेखिका वृंदा कांबळी, प्रा. आनंद बांदेकर, महेश राऊळ उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून `सृजनवाट’ या कार्यक्रमांतर्गत कवी विनय सौदागर यांच्या भोवताल या मालवणी भाषेतील काव्यसंग्रहावर वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून साकारलेला अभिनव असा काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला.