प्रतिनिधी / बेळगाव
बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्याचे काम तीन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. रस्त्याशेजारी साईडपट्टय़ा घालण्याचे काम अपूर्ण असून काही ठिकाणी उघडय़ावर सोडण्यात आलेल्या लोखंडी सळय़ा वाहनधारक आणि नागरिकांना जीवघेण्या ठरत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहापूर, वडगाव परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत बसवेश्वर चौक ते डाक बंगला तेथून बॅ. नाथ पै चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. काँक्रिटीकरण करून दोन महिने होत आले तरीदेखील अपूर्णच आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी घिसाडघाई करण्यात आली. पण साईडपट्टय़ा घालण्यास विलंब झाला आहे. डाक बंगल्याजवळ डेनेजवाहिन्या आणि टेलिफोन केबल जोडण्याचे काम हाती घेण्यात आल्याने खोदाई करण्यात आली असून अडथळे निर्माण झाले आहेत. डाक बंगला ते नाथ पै चौकापर्यंतच्या रस्त्याशेजारी पेव्हर्स घालण्यात आले नसून साईडपट्टय़ांचे काम करण्यास विलंब झाला आहे.
रस्ता काम कधी पूर्ण होणार?
हा रस्ता रहदारीचा आहे. वडगाव, खासबाग, शहापूर, जुने बेळगाव, येळ्ळूर विभाग अशा विविध भागात ये-जा करणाऱया वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या रस्त्यावरूनच बसवाहतूक सुरू असते. त्यामुळे हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारक आणि परिसरातील रहिवाशांचे हाल होत आहेत. साईडपट्टय़ा नसल्याने दुचाकी वाहनधारक सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर वाहने पार्क करीत असल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार निर्माण होत आहे. साईडपट्टय़ा नसल्याचे वाहनधारकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे अपघात घडत आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळय़ा उघडय़ावर सोडण्यात आल्या असून याचा धोका वाहनधारक आणि पादचाऱयांना निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या विकासाचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. साईडपट्टय़ांचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.