वसुबारस
आश्विन वद्य द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस. आज सवत्स धेनुची पूजा करायची. वसू म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. ही पूजा घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून करतात. या दिवसापासून घरच्या लेकी सुना, मुलीबाळी अंगणात रांगोळय़ा काढतात. अंगण पणत्यांच्या दिव्याने उजळतात. गोठा स्वच्छ करून उजेड करतात. दीपावलीची सुरुवात करायची ती वात्सल्याची पूजा करून, ही कल्पनाच रम्य आणि अफलातून. अशा कल्पना करणारे, देवीकडून अपत्य मिळवणारे आपले पूर्वज धन्य. दीपावलीची सुरुवात सवत्स धेनूच्या पूजेने करा आणि लेकराच्या सुखाची कामना करा.
आश्विन वद्य त्रयोदशी : धनत्रयोदशी
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. धनत्रयोदशी दिवशी धनाची देवी भगवान विष्णुची पत्नी लक्ष्मी धनाचा खजिनदार कुबेर आणि लक्ष्मीचा मानलेला भाऊ, जो विष्णूचे प्रतिरूप मानला जातो तो देवांचा वैद्य धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनप्राप्ती, धनरक्षण आणि धनाइतकेच महत्त्वाचे म्हणजे आरोग्य. त्या संपदेचे रक्षण करणारे वैद्यराज यांची प्रार्थना करायची. धन्वंतरी मंथनातून वर आले तेव्हा त्यांच्या हातात अमृत कलश होता म्हणून या दिवशी कलश खरेदी करण्याची पद्धत आहे. पूजा केली की लक्ष्मीचा निवास कायम राहतो. कलशात पाणी घालून, पूजा करून ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले की आरोग्य लाभते. रोगराई दूर होते. कोरोना दूर व्हावा म्हणून या दिवाळीत मनोभावे पूजा, प्रार्थना करूया. प्रयत्नांती परमेश्वर हे तर खरेच. कुणाच्याही आरवण्याने का असेना आरोग्याचा सूर्य उगवणे महत्त्वाचे. या दिवशी घरातील स्त्रिया न्हाऊन देवीदेवतांची पूजा करतात. दुकानदार घरी पाटावर लक्ष्मी, वहय़ा, धंद्याची हत्यारे, सोने नाणे ठेवून पूजा करतात. धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. पूजेसाठी झेंडूची फुले वापरतात.
संध्याकाळी थोडी कणिक घेऊन त्यात तेल हळद घालून नीट मळून त्याचा एक दिवा करतात. तो लावून अंगणात दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. याला यम दीपदान म्हणतात. यमराजाची अवकृपा होऊ नये म्हणून दीपाला हळदकुंकू वाहून पूजा करून प्रार्थना केली जाते. दीपदानाने अपमृत्यूचे भय रहात नाही अशी श्रद्धा आहे. मुख्य दरवाजाबाहेर धान्याचा छोटा ढीग करून त्यावर दीप ठेवल्याने धनधान्य वृद्धी होते असाही विश्वास आहे. या गोष्टी करण्याने नुकसान नाही. त्यात अंधश्रद्धा, करणीबाधा असलेही काही नाही. तमाचा नाश करणारा दीप तर लावायचा आहे. तम अज्ञानाचा अनारोग्याचा, अंधश्रद्धाचाही असतो. त्याचा नाश करणे केव्हाही चांगले. तेव्हा कणकेचा दिवा करून दीपदान करूया.
आश्विन वद्य चतुर्दशी : नरक चतुर्दशी!
श्रीकृष्णाने नरकासुराचा वध आश्विन वद्य चतुर्दशी दिवशी केला म्हणून नरकचतुर्दशी हे नाव. अशीही कथा आहे की अनंत चतुर्दशीला फार गर्व झाला. शिक्षा म्हणून आश्विन चतुर्दशीला तिला नरकात टाकले. म्हणून नरकचतुर्दशी हे नाव. पुढे कार्तिक शुक्ल चतुर्दशीला तिचा उद्धार झाला म्हणून ती वैकुंठ चतुर्दशी.
नरकचतुर्दशी दिवशी पहाटे स्नान करावे. अंघोळ करण्याआधी पत्नीने न्हाणीघरातच पतीला तेलमर्दन करावे. नंतर उटणे आणि तिळाची पूड चोळून स्नान घालावे. त्यादिवशी पाण्यात गंगा आणि तिळात लक्ष्मी असते अशी श्रद्धा. अर्धी अंघोळ झाली की, औक्षण करावे. पती पूर्ण भिजलेला. पत्नीही थोडी भिजलेली वर खोचलेली साडी, एवढय़ाशा न्हाणीघरात गरम पाण्याच्या वाफेचे ढग, त्यात मिसळलेला उटण्याचा, तेलाचा सुगंध, निरांजनातल्या तुपाचा परिमळ सोबत घेऊन तेवणारी ज्योत, तिच्या हलणाऱया पिवळय़ा प्रतिमा पत्नीच्या डोळय़ात उमटलेल्या. केसातले गालावर ओघळलेले थेंब आवरत तो खाली झुकला आहे. नजरेत मिसळलेली नजर, हातातले तबक हलके थरथरते. एकत्र कुटुंब पद्धतीत असे भरभरून रोमँटिक क्षण पतीपत्नींना द्यावेत, ही कल्पकता आपल्या पूर्वजांनाच सुचणार.
अंघोळ झाली की पणत्या लावायच्या. तुळशीपाशी, विहिरीपाशी आणि अंगणभर (एक संडासातही) एक न्हाणीघरात, विहिरीबरोबर आजकाल नळापाशीसुद्धा एक. मग फराळ. दिवाळीच्या चार दिवस आधी फराळ तयार होई. चकली, कडबोळी, करंज्या, चिवडा, रवा आणि बेसन लाडू,. (नुसत्या रव्याचे लाडू सणाला करायचे नाहीत.) आणि शंकरपाळे, पाडव्याला खास चिरोटे. नवे कपडे. सर्वांनी एकत्र फराळ करायचा. हे एवढे जिन्नस असूनही उप्पीट हवेच, साध्या तेलावर भाजलेला रवा, हिंग मोहरीच्या फोडणीत चुरलेला कडीपत्ता नी गरम पाणी वरून घालून शिजवलेले उप्पीट त्यादिवशी अमृताचे लागते. तसे ते पुन्हा वर्षभरात होत नाही. दीपावली हा सण महत्त्वाचा कारण तो घराघरात आनंदाचे दीप उजळतो. पती पत्नीच्या नात्यातले बंध आणखी गहिरे करतो. नरकासुररुपी पापी शक्तींचा नाश करतो. आपणही आपल्यातील आणि बाहेरच्या पापी शक्तींना ही दीपावली दूर करो, सभोवताली आनंदाचे सुखासमाधानाचे शांतीचे विश्व फुलो अशी त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करुया.
आश्विन अमावास्याः लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस. घर सजवायचे, बाहेरच्या दारावर झेंडूची माळ लावावी. चौकटीवर आंब्याचे तोरण बांधावे. पायरीसमोर सुरेख रांगोळी काढावी. लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यापारी व गृहलक्ष्मी यांच्या दृष्टीने महत्त्वाचा. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवे वर्ष या दिवशी सुरू होते. वहय़ांची पूजा करण्याचा हा दिवस. पाडव्यापासून नवी कीर्द नवी खनावणी. गृहिणी घरातल्या धनाचे पूजन करून वृद्धी व्हावी अशी प्रार्थना करतात.
देवापुढे चौरंग मांडून (चौरंग नसला तर पाट) चारी पायांना कर्दळी बांधाव्या. रांगोळी घालावी. चौरंगावर मध्यभागी तांदूळ पसरावेत. समोर विडय़ाची 2 पाने त्यावर सुपारी व दक्षिणा ठेवावी. असे 5 विडे ठेवावेत. 2 विडय़ांच्या मध्ये पेरु, सफरचंद, डाळिंब असे एक फळ ठेवावे. 5 फळे व केळीचा फणा ठेवावा. तांब्यावर ओल्या अनामिकेने हळदीकुंकवाच्या उभ्या रेषा ओढाव्या. तांब्यात पाणी व नाणे घालून वर आंब्याच्या पाच पानांची छोटी डहाळी खोचावी. पाने व्यवस्थित गोलाकार बसवून वर तबक व ताट ठेवावे. (तांब्याच्या गळय़ात चेन वा हार घालावा) तबकात सोने, चांदी, असतील तर रत्ने, एक अंगठी नवग्रहाची ठेवली तर पुरते. नाणी, नोटा ठेवाव्यात. पूजेसाठी हळदकुंकू, गुलाल, बुक्का, शेंदूर, अष्टगंध, पंचामृत, दुर्वा, गेजावस्त्र, फुलवाती, तूप, धूप, दीप अगरबत्ती, कापूर, पळी पंचपात्र, ताम्हण, पाण्याचा तांब्या, चमचा, बत्तासे, धणे, लाहय़ा इ. ची नीट मांडणी करून ठेवावी. दुर्वा, फुले, शंख, कमळ वेगळे ठेवावे. आता पूजा. चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर सुपारीचा गणपती स्थापन करावा. उजवा हात हृदयावर ठेवून तो हात सुपारीला लावावा. त्या गणपतीची आधी शोडषोपचार पूजा करावी. गणपतीला गूळ-खोबऱयाचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना करावी. मग तबकात मांडलेल्या दागिन्यांची व इतर वस्तुंची पूजा करावी. लक्ष्मीपूजनादिवशी महाकालीचे प्रतीक लेखणी, महासरस्वतीचे प्रतीक दौत व चोपडी आणि महालक्ष्मीचे प्रतीक धन, या तिन्हांची पूजा केल्याने या तीनही देवता गृहलक्ष्मीला सुख समाधान, शांती, धनदौलत, अस्मिता, स्वाभिमान आणि स्वत्व मिळवून देतात. विश्वास असो वा नसो पूजा करण्याने हा एवढा लाभ होणार असेल तर करावी. पण करायची तर मनोभावे करायला हवी.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा : बलिप्रतिपदा-पाडवा
बळीराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. अंगणात बळीराजाची शेणाची मूर्ती करून तिची पूजा केली जाते. गायीचे मलमूत्र औषधी, म्हणून दीपावलीत ज्या मूर्ती करायच्या त्या शेणाच्या आणि त्यावर झेंडूच्या फुलांची आरास. हिरवीगार नी पिवळी धमक रंगसंगती आकर्षक वाटते.
या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होते. हिंदू लोक चैत्र पाडवा, दसरा आणि बलिप्रतपिदा किंवा दिवाळी पाडवा हे तीन व अक्षय्यतृतीया हा अर्धा असे साडेतीन शुभमुहूर्त मानतात. या तिन्ही तिथी शुभ असतात. सोने खरेदी, गृहप्रवेश, कोणतेही चांगले काम यासाठी हे चारही दिवस अत्यंत उत्तम मानले जातात. व्यापारी नव्या वहय़ा कुंकवाने स्वस्तिक काढून शुभ लाभ लिहून पूजा करून त्या वापरायला सुरुवात करतात.
घरात पत्नीने पाटाभोवती रांगोळी काढून त्याला वासाचे तेल लावून मग न्हाणीघरात आंघोळ घालावी. उटणे लावावे. संध्याकाळी देवासमोर पतीला ओवाळावे. औक्षण करून तबकातली सुपारी पतीच्या हातात द्यावी. सुपारीबरोबर पतीने तबकात ओवाळणी घालायची. आपापल्या हौसेनुसार आणि ऐपतीप्रमाणे पैसे, साडी, वस्तू, दागिना घालतात. शेवटी हौसेला मोल नसते. नवे लग्न झालेल्या जोडप्याची पहिली दिवाळी मुलीच्या माहेरी करण्याची पद्धत आहे. याला दिवाळसण म्हणतात. सासऱयाने जावयाला काहीतरी भेट देण्याचा प्रघात आहे. मुलीला साडी दागिना देतात. काही ठिकाणी परतीचा अहेर करण्याची पद्धत आहे. जावयाने ती पाळावी. सासुसासऱयांना काहीतरी परत भेट द्यावी. देण्यातला आनंद हा घेण्यातल्या आनंदापेक्षा जास्त असतो. काही घरात कन्या वडिलांना ओवाळते. एकूण ओवाळायचे ते फक्त पुरुषांना. वाढदिवस हा वर्षातून एकच दिवस मुलीचे औक्षण होते. आणि मग घरभरणी, नवऱयाशी लग्न झाले म्हणून डोहाळे जेवण, कारण पतीच अशा दोन वेळा औक्षण. पण स्त्री प्रेमाने कौतुकाने आपलुकीने इतरांना ओवाळू शकते म्हणूनच ही गोड कामगिरी तिला दिली पूर्वजांनी असे आपण समजूयात. पाडव्या दिवशी नैवेद्यापुरते पुरण घालून जेवणात श्रीखंड, बासुंदी, जिलेबी असे मिष्टान्न असते. बाकी चारीठाव असा रुचकर स्वयंपाक. आज नवे काहीतरी करण्याचा संकल्प करावा. हो अगदी थर्टी फस्ट नाईटला बरोबर 12 च्या ठोक्मयांना करतो तस्सा!
कार्तिक शुद्ध द्वितीयाः भाऊबीज
आईमुळे जोडले गेलेले जन्मापासूनच नाते म्हणजे बहीण भावाचे नाते. सहोदरी नाते असे हे एकच. भाऊ बहिणीच्या नात्याचा, प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. या सणाची सुरुवात झाली ती मथुरा नगरीच्या विश्रामघाटावर. प्रत्यक्ष काळ अर्थात यमराज व त्याची बहीण यमुना ऊर्फ यमी यांच्यातील प्रेमभोजनाने. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया. भाऊबिजेला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी बहीण भावाला पाटावर बसवून तेलाने मर्दन करून उटणे लावून न्हाऊ घालते. नंतर त्याला देवासमोर पाटावर बसवून औक्षण करते. भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून वस्तू, पैसे, कपडे असे काहीतरी देतो. लग्न झालेली बहीण भावाला आपल्या घरी बोलावते. ओवाळते. श्रीखंड पुरी बटाटय़ाची भाजी असा छान स्वयंपाक करून भोजन वाढते. भावाने बहिणीची विचारपूस करावी. तिच्यासाठी काहीतरी करावे. दोघामध्ये स्नेहाचे नाते असावे यासाठी भाऊबीज हा अत्यंत महत्त्वाचा सण. संध्याकाळी पुन्हा एकदा देवापाशी, तुळशीपाशी दिवा लावून भावाला औक्षण करावे आणि फराळ करायला द्यावा. भावा बहिणीमधल्या प्रीतीचे प्रतीक असणारा हा सण मनभावन वाटतो खरा. मृत्युदेव यम म्हटले की नकळत कर्दनकाळ हाच शब्द आठवतो. पण यमराजसुद्धा भावासारखा प्रेमळ वागतो. तोही कुणाचा प्रिय भाऊ आहे. त्याचेही आपल्या बहिणीवर प्रेम आहे. यमराजा आणि त्याची बहीण यमुना ऊर्फ यमी यांच्या प्रेमाची कहाणी म्हणजेच भाऊबिजेची कहाणी. अशी श्रद्धा आहे की यमद्वितीया म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेदिवशी मथुरेच्या विश्रामघाटावर स्नान करणाऱया भाऊ बहिणीला प्रत्यक्ष यमदेवही शासन करू शकत नाही.या दिवशी भारतात काही ठिकाणी ‘आक्कानं तीज’ म्हणजे बहिणीचा दिवस साजरा करतात. पंचमी दिवशी शेणाचे पाच पांडव करून त्यांची पूजा करण्याचीही पद्धत आहे. सकाळी चंद्रदर्शन करून स्नान करावे म्हणजे पहाटे उठावे. भाऊ नसेल तर भाऊ मानलेल्या व्यक्तीला बोलवावे. तसे कुणी नसेल तर चंद्राला ओवाळावे. अशा तऱहेने हा सण साजरा करावा.
दीपावली शेवट!
दीपावली संपली की चतुर्मास संपल्यासारखाच. कार्तिक एकादशी झाली की व्रतवैकल्यांची सांगता होते. आषाढी एकादशीला चतुर्मास सुरू होतो तो सुगी झाली की संपतो. पावसाळय़ात वातावरण दूषित असते. रोगराईची शक्मयता. हवामान कुंद, आकाश ढगाळ, सूर्यप्रकाश नाही. पाणी चिखल जीवजंतू यांचे राज्य म्हणून आपल्या ऋषी मुनींनी, विद्वानांनी, शास्त्र जाणकारांनी आणि आयुर्वेदाचार्यांनी आपला आहार आणि व्रतवैकल्ये यांची सांगड घातली. स्वत:ची, आसपासची, घराची स्वच्छता करणे किती महत्त्वाचे हे शिकवले. सण आणि स्वच्छता एकत्र गुंफले. सणांच्या निमित्ताने जळमटे मनातली आणि घरातली स्वच्छ करायला शिकवले. आहार हा आरोग्याचा पाया हा मूलमंत्र आचरणात आणायला नकळत बजावले. चपला बाहेर काढणे, हातपाय धुणे, ताजे गरम अन्न खाणे, एकमेकांची चौकशी दुरूनच करणे अशा गोष्टी आपले शरीर आणि मन यासाठी अत्यंत उपयुक्त. मन निरोगी हवे तर शरीर निरोगी हवे. दोहोंचे स्वास्थ्य हवे असेल तर काही नियम पाळणे आवश्यक. आपल्या पूर्वजांनी या नियमांना व्रताचे स्वरुप दिले. चतुर्मास हा व्रतांचा काळ. त्याचा शेवट केला तो दिवाळीसारख्या सर्वोत्तम सणाने. 2020 ने आपल्याला खूप काही शिकवले. भारतीय रितीरिवाज, चाली, प्रथा कसे सुयोग्य हे नव्याने कळले. व्रतवैकल्यांच्या मागे शास्त्र आहे आणि आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी ते महत्त्वाचे आहे हेही समजले.
– आशा रतनजी