‘नवीन युगाची शिक्षण पद्धत : आव्हाने आणि मार्गक्रमण’ या विचार
प्रतिनिधी /बेळगाव
नोकरी व पैसे मिळविणे या साचेबद्ध हेतुपलीकडे जाऊन आनंदासाठी शिक्षण ही संकल्पना रुजविण्याची गरज आहे. बुद्धी आणि मनाचा सर्वंकष विकास शिक्षणाच्या माध्यमातून झाला पाहिजे. नूतन शैक्षणिक धोरण या अनुषंगाने राबविले गेले तरच ते प्रभावी ठरू शकते, असे मत शिक्षणतज्ञ व द्विभाषिक लेखक डॉ. आशुतोष पोतदार यांनी केले.
एसकेई सोसायटीचा स्थापना दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. या निमित्त आरपीडी कॉलेजच्या मिनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. पोतदार बोलत होते. ‘नवीन युगाची शिक्षण पद्धत : आव्हाने आणि मार्गक्रमण’ हा त्यांचा विषय होता. व्यासपीठावर सोसायटीचे पदाधिकारी राज देशपांडे, किरण ठाकुर, खेमराज सावंत, सेवंतीलाल शाह, विनायक आजगांवकर, अध्यक्ष म्हणून पंकज शिवलकर उपस्थित होते.
डॉ. पोतदार म्हणाले, शिक्षण हे केवळ पुस्तकी नाही तर त्याला तात्विक आणि चिंतनाचे अधिष्ठान आहे. मात्र, साचेबद्ध शिक्षणाच्या चौकटीतून आपण बाहेर यायला हवे. गुरुकुल शिक्षण पद्धत आपल्याकडे होती. परंतु त्यामधील उतरंड योग्य आहे का हे तपासायला हवे. शिक्षक शाळेत ऐकवण्यासाठीच येतात. परंतु कधी कधी त्यांनी ऐकण्याची सवयही ठेवायला हवी. विनाशर्त शिक्षण देण्याची प्रक्रिया गतिमान होणे आवश्यक आहे.
आपल्याला जुनी शिक्षण पद्धत सोडावयाची नाही. परंतु काळाशी सुसंगत असे बदल त्यामध्ये करता येणे आवश्यक आहे. हे बदल केवळ शिक्षण संस्थांनी किंवा सरकारने नव्हे तर समाजानेसुद्धा त्यासाठी सक्रीय होणे आवश्यक आहे. शिक्षण ही सामाजिक पद्धतीचा एक भाग आहे. सुसंवाद हे शिक्षणाचे ब्रिद असावे. नूतन शैक्षणिक धोरणांतर्गत तो वाढला पाहिजे, बुद्धी इतकाच मनाचा विकास कसा होईल आणि सर्वंकष शिक्षण कसे मिळू शकेल, याचा विचार होणे आवश्यक आहे. याशिवाय त्याकडे केवळ एक राजकीय धोरण म्हणून न पाहता त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हेमराज सावंत यांनी राजमाता पार्वती देवी यांचे स्मरण करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळायला हवे, असे नमुद केले. अध्यक्ष पंकज शिवलकर यांनी एसकेई सोसायटीने ‘केजी टू पीजी’ असा प्रवास यशस्वीपणे केला असून, शिक्षण क्षेत्रात सदैव ही संस्था कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली. प्रारंभी श्रेया आणि सहकारी यांनी भरतनाटय़ नृत्य सादर केले. आरपीडीच्या प्राचार्या शोभा नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालिका लता कित्तूर यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. कॉमर्स विभागाचे प्राचार्य सुधीर शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पाहुण्यांच्या हस्ते राणी पार्वती देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आरपीडी कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी यांनी कॉलेजचा सांस्कृतिक विभाग गतिमान करणार असल्याचे स्पष्ट केले. आभार मानले. प्रा. पूजा पाटील व प्रा. प्रसन्ना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नूपुर रानडे यांनी वंदेमातरम् सादर केले, पद्मश्री पाटील यांनी फुलांची रांगोळी रेखाटली होती. हॉकीमध्ये भारतीय संघाने यश मिळविल्याबद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.