केजरीवालांच्या उपस्थितीत भव्य रोड शो
पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयावर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अमृतसरमध्ये रोड शो केला. या भव्य विजयोत्सव मिरवणुकीत भगवंत मान हे केजरीवाल यांच्यासमवेत उभे होते. यावेळी शहरातील कचरी चौक ते नॉव्हेल्टी चौकापर्यंत दोन्ही नेत्यांनी गाडीतून बाहेर येत उपस्थितांना अभिवादन केले. नॉव्हेल्टी चौकात भगवंत मान आणि केजरीवाल यांनी संयुक्तपणे रोड शोला संबोधित केले. पंजाबमध्ये 92 जागा जिंकल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.
विजयोत्सव मिरवणुकीतील रोड शोच्या शेवटी भाषण करताना अरविंद केजरीवाल यांनी विजयाबद्दल पंजाबच्या तीन कोटी जनतेचे आभार मानले. पंजाबमधील जनतेने कोणालाही विश्वास बसणार नाही असे यश पक्षाला मिळवून दिले आहे. . पंजाबी नेहमीच क्रांती करतात असे जग मानते, पण एवढी मोठी क्रांती होईल असे आम्हालाही वाटले नव्हते. राज्यातील बडय़ा-बडय़ा नेत्यांचा पराभव झाला यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. सुखबीर हरले, प्रकाशसिंग बादल हरले, कॅप्टन हरले, सिद्धू हरले अशी डरकाळी फोडत त्यांनी पक्षाने जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार
अनेक वर्षांनी पंजाबला भगवंत मान यांच्या रूपाने एक प्रामाणिक मुख्यमंत्री मिळाला आहे. आमच्या पक्षाच्या कोणत्याही आमदाराने गोंधळ घातला तर त्याला सोडले जाणार नाही. प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल. मात्र, काहींना वेळ लागू शकता, असेही केजरीवाल म्हणाले. 16 मार्चला भगवंत मान मुख्यमंत्री होणार नाहीत, तर पंजाबचा प्रत्येक मुलगा मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत भगतसिंग यांचे स्वगृह असलेल्या खटकरकलन येथील शपथविधी कार्यक्रमासाठी त्यांनी पंजाबमधील सर्व लोकांना निमंत्रित केले.
आम आदमी पक्ष राज्याच्या विकासासाठी नव्याने पुढाकार घेईल आणि पंजाबचा विकास करेल. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन होईल यावर आपला पूर्ण विश्वास होता, असे मान म्हणाले. बाबासाहेब आणि भगतसिंग यांची छायाचित्रे मुख्यमंत्री कार्यालयात लावण्याची गरज त्यांनी पुन्हा एकदा सांगितली. जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ‘जे हृदयावर राज्य करतात तेच सरकार चालवतात’ असेही ते म्हणाले.
शपथविधी सोहळय़ाचे सर्वांना आमंत्रण
भगवंत मान यांनी सर्व कार्यकर्त्यांना शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व पंजाबींनी बसंती रंगाच्या पगडय़ा घालून यावे. राज्याचे नेतृत्त्व हाती घेण्यापूर्वी भगतसिंगांच्या विचारसरणीला सलाम करावा लागेल आणि त्यांच्या विचाराचा सुगंध घरोघरी पोहोचवावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. नॉव्हेल्टी चौकातच आम आदमी पक्षाच्या विजयी मिरवणुकीची सांगता झाली. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर नतमस्तक होत आपच्या नेत्यांनी महापुरुषांना अभिवादन केले.