भंडारी समाजाच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी /फोंडा
भंडारी समाजाने आम आदमी पार्टीला पाठिंबा दिल्याचे जे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्याच्याशी गोमंतक भंडारी समाज केंद्रीय समितीचा कुठलाच संबंध नाही. सुदेश कळवटकर व अन्य काही लोकांनी केलेले हे जाहीर विधान त्यांचे वैयक्तिक मत असावे, असे स्पष्टीकरण भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी दिले आहे. गोवा भेटीवर आलेले आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिराला भेट दिली. केंद्रीय समितीला तेथे निमंत्रण नव्हते, किंवा केंद्रीय समितीपैकी कुणीही त्यांना निमंत्रण दिले नव्हते. समितीचा एकही पदाधिकारी तेथे उपस्थित नव्हता. रुद्रेश्वर देवस्थान हे गोव्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने तेथे कुणीही दर्शनाला येऊ शकतात. भंडारी समाजात विविध पक्षांशी संबंधित नेते आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या अफवा वारंवार पसरविल्या जातील. याचा अर्थ भंडारी समाजाने एखाद्या पक्षाला पाठिंबा दिला असे होऊ शकत नाही. गोमंतक भंडारी समाज ही बिगर सरकारी संस्था किंवा राजकीय पक्ष नाही. त्याला 106 वर्षांचा इतिहास आहे. सरकार दरबारी ही संस्था अधिकृत नोंद असून राज्यभर चार हजाराहून अधिक आजीव सदस्य आहेत. प्रत्येक तीन वर्षांनी केंद्रीय समितीची निवडणूक होते. गोव्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत भंडारी समाजाची लोकसंख्या 54 टक्के आहे. एखाद्या पक्षाला समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी या गोष्टी आधी समजून घ्यायला हव्यात. भंडारी आडनाव असलेल्या सर्व व्यक्ती या समाजाशी संबंधित असतीलच असेही नाही, असे अशोक नाईक यांनी स्पष्ट केले आहे.