रोजगार हमी कार्यक्रमासाठी 1,12,056 जणांची स्वाक्षरी
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पार्टीतर्फे राज्यातील तळागाळात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार यात्रेत गोमंतकीयांचा मोठय़ा संख्येने सहभाग दिसून आला. प्रचारादरम्यान आपने 1700 बूथ सभा घेतल्या. तसेच 2,50,000 लोकांकडे थेट संपर्क साधला. यात्रेदरम्यान 1,12,056 लोकांनी रोजगार हमी कार्यक्रमासाठी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवला. काल या यात्रेचा समारोप झाला.
राज्यात सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असताना सावंत सरकार 10,000 नोकऱया देण्याच्या केवळ घोषणाच करत आहेत. त्यांची ही घोषणा प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक निवडणुकीवेळी करण्यात येते. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही, अशी बेकारी कमी होत नाही, अशी टीका पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली आहे.
कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या खाणींमुळे खाण अवलंबितांसह अन्य घटकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दुसऱया बाजूने मुख्यमंत्री सावंत हे गोव्यातील तरुणांच्या आशा आणि स्वप्नांशी फुटबॉलसारखे खेळत आहेत. त्यांना नोकऱया देण्यात ते अपयशी ठरले आहेत आणि आता रोजगार मेळाव्यांच्या नावाने त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आपचे नेते विघ्नेश आपटे म्हणाले.
याऊलट केजरीवाल यांनी गोव्यातील तरुणांसाठी खासगी क्षेत्रात 80 टक्के नोकऱया राखीव ठेवल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. त्याशिवाय पर्यटन आणि खाणकाम बंद पडल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना मासिक 5,000 रुपये दिले जातील. दिल्लीच्या धर्तीवर गोव्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार आहेत. त्याद्वारे गोव्यातील सरकारी नोकऱयांमधील घराणेशाही संपुष्टात आणेल आणि सामान्यांना नोकऱया उपलब्ध करून देतील, असेही आश्वासन दिले आहे, असे आपटे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून आप च्या योजनांची वारंवार नक्कल : म्हांबरे
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे केजरीवाल मॉडेल आणि त्यांच्या योजनांची वारंवार नक्कल करत असल्याचे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले असताना आता पुन्हा एकदा त्यांनी आप च्या रोजगार यात्रेची नक्कल करत स्वतःची रोजगार मेळाव्यांच्या नावाने मोहीम सुरू केली आहे. त्याशिवाय स्वतःही राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे, असा दावा राहूल म्हांबरे यांनी केला आहे.
केजरीवाल यांनी गत महिन्यात गोवा भेटीत राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक तरुणाला रोजगार देण्याची हमी दिली होती. तसेच रोजगार मिळेपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला दरमहा 3,000 रुपये दिले जातील. पर्यटन आणि खाणकाम बंद पडल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना दरमहा 5,000 रुपये दिले जातील, असे आश्वासन दिले होते.
आप च्या रोजगार यात्रेमुळे मुख्यमंत्र्यांना जाग : वाल्मिकी
आप’ची रोजगार यात्रा नसती तर मुख्यमंत्री आजही बेरोजगारीच्या मुद्यावर गंभीर नसते असे आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी म्हटले आहे. परंतु त्यांना बेरोजगारांची आठवण झाली ती निवडणुकीस दोन महिने असताना. गेल्या 5 वर्षांपासून ते कुठे होते आणि तेव्हा त्याच्या अजेंडय़ावर रोजगार का नव्हता? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.