प्रतिनिधी /पणजी
उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी आम आदमी पक्षातर्फे विविध मतदारसंघामधून सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मांद्रेतून ऍड. प्रसाद शहापूरकर, मुरगावमधून परशुराम सोनुर्लेकर, साळगावातून मारिओ कार्देरो, सांखळीतून मनोज घाडी, ताळगावमधून सेसिल रॉड्रिग्स, थिवीतून उदय साळकर आणि वास्कोतून ऍड. सुनील लोरान यांचा समावेश आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना ऍड. शहापूरकर यांनी भाजप सरकारने मांद्रे मतदारसंघावर केलेल्या अन्यायाची अनेक उदाहरणे पत्रकारांसमोर उघड केली. तुये ईएसडीएम पार्क पूर्णत्वास आला असता तर एक हजार नोकऱया उपलब्ध झाल्या असत्या. परंतु विलंबामुळे तरुणांवर अन्याय झाला आहे. आप’ची सत्ता आल्यास हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे ते म्हणाले.
ताळगावला मतदारसंघाच्या नियोजनशून्य विकासामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सांडपाणी प्रकल्प 10 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याशिवाय 25 वर्षांपासून शेतकरी आणि मच्छिमारांच्या समस्या कुणीही ऐकून घेतलेल्या नाहीत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सेसिल रॉड्रिग्स यांनी सांगितले.
गोव्यातील लोक काँग्रेस आणि भाजपला कंटाळले असून त्यांना बदलाची गरज आहे. सध्या त्यांच्याकडे ’आप’ हा एकमेव पर्याय आहे. ’आप’ सत्तेत आल्यास भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊन राज्याचा कायापालट करेल, असे मनोजकुमार घाडी यांनी सांगितले.