सृष्टीतील एकही गोष्ट जी आपल्याला उघडय़ा डोळय़ांनी दिसते किंवा दिसत नाही त्यास एक विशिष्ट रचना असते. निसर्गातील पशु-पक्षी, वृक्ष, लता, वेली ह्यास एक विशिष्ट रचना आहे. ज्यास रचना नसते ते विचित्र किंवा बेढब दिसते अथवा जाणवते. मनुष्याचे शरीरसुद्धा एक रचनाच आहे. जे रचनात्मक नाही ते विधायक असू शकत नाही आणि जे विधायक नाही ते विघटनात्मक आहे. एखादी रचना पूर्णरूपास येण्याकरिता जो रचनाकार असतो त्यास शिस्त असावी लागते. ती शिस्त आंतरिक आणि बाह्यही असू शकते. म्हणूनच श्रीसमर्थांनी मनोबोधाद्वारे आंतरिक शिस्त कशी असावी हे सांगितले आहे तर श्रीमद ग्रंथराज दासबोधाद्वारे बाह्य आणि संघटनात्मक शिस्त ह्यासंबंधी सांगितले आहे.
शिस्त असेल तर मनुष्यजीवन हे किती सुंदररित्या घडू शकते हे वारंवार श्रीसमर्थांनी त्यांच्या ग्रंथसंपदेतून पटवून दिले आहे. व्यवस्थापनशास्त्रात शिस्त हा खूप महत्त्वाचा घटक आहे. शिस्त म्हणजे नियमानुसार किंवा आखलेल्या पद्धतीनुसार वागणूक करणे होय! प्रत्येक व्यवसायसंस्थेस व्यवसायाचे कार्य यशस्वीपणे पार पाडण्याकरिता कर्मचाऱयांच्या वागणुकीचे काही नियम बनवावे लागतात. हे नियम कायदेशीर असतात किंवा कर्मचारी आणि व्यवस्थापन ह्यांच्या सहमतीने अथवा संमतीने केले जातात. जर वागणुकीच्या संदर्भातील नियम मोडले गेले तर मात्र शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. शिस्त म्हणजे चुका दुरुस्त करणे, आज्ञाधारकपणा लादून मिळवलेले नियंत्रण करणे होय. सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन शिस्तपालनाचे दृष्टिकोन आहेत. ज्या दृष्टिकोनात कर्मचारी शिस्त मान्य करून त्यावर विश्वास ठेवतात, तसेच कर्मचारी जर नियम आणि अपेक्षित वागणुकीवर ठाम असतील तर त्यास सकारात्मक शिस्त असे म्हणतात. ज्या शिस्तीमुळे कर्मचाऱयाचे वर्तन बदलवण्यास मदत होते, त्याचा/तिचा विकास होण्यास मदत होते आणि जेव्हा कर्मचारी स्वेच्छेने वागणुकीचे अपेक्षित मापदंड स्वीकारतात तेव्हा ती सकारात्मक शिस्त किंवा स्वयंशिस्त ठरते. पण जेव्हा काही कर्मचारी शिस्त मान्य करत नाहीत, शिस्तीवर त्यांचा विश्वास नसतो, संघटनेने अथवा व्यवसायसंस्थेने ठरवून दिलेले नियम, कायदे किंवा वागणुकीच्या अपेक्षित मापदंडानुसार जर ते बेपर्वा असतील तर अशा स्थितीत कर्मचाऱयांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार आणि कायद्यानुसार आदेशाचे पालन करून कार्य पूर्णत्वास नेण्याकरिता जी ताकीद, दंड अवलंबिला जातो त्यास नकारात्मक शिस्त असे म्हणतात. ह्याविषयी श्रीसमर्थ म्हणतात की,
नेमकेपणे वर्तो लागला! तो बहुतांस कळों आला!सर्व आर्जवी तयाला! काय उणे!!
उदंड धी:कारून बोलती! तरी चळों नेदावी शांती!दुर्जनास मिळोन जाति! धन्य ते साधू!! 10/12/14-16
म्हणजे, स्वतःच्या ध्येयाला अनुसरून जो मनुष्य शिस्तीने वागू लागला म्हणजे पुष्कळ लोकांना माहीत होतो. सर्वांना तो प्रिय होतो. त्याला काहीही कमी पडत नाही. कोणी अवहेलना केली तरीही उत्तम पुरुषाने स्वतःची शांती भंगू देऊ नये. दुर्जनांशी जे समरस होऊ शकतात तेच खरे साधू पुरुष आहेत.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने जे कर्मचारी स्वयंशिस्त असतात ते संघटनेत किंवा व्यवस्थापन संस्थेत सर्वांच्या परिचयाचे होतात. त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढत जातो आणि ते लोकप्रिय बनतात. त्यांचे कुठलेही काम अडत नाही. ह्याचा प्रत्यक्ष लाभ हा संबंधित संघटनेला अथवा व्यवसायसंस्थेस होतो. असे शिस्तप्रिय कर्मचारी/अधिकारी हे संस्थेत काम करत असताना जर त्यांच्याशी कोणी दुर्व्यवहार केला तर ते स्वतःचे मानसिक संतुलन बिघडू देत नाहीत. व्यवसाय संस्थेतील काही कामचुकार अथवा दुर्जन लोकांना पण ते स्वतःच्या वागणुकीतून आपलेसे करवून घेतात. सकारात्मक शिस्त म्हणजे काय ह्याचे येथेच प्रत्यंतर येते.
नकारात्मक शिस्त म्हणजे काय किंवा नकारात्मकरित्या शिस्त पाळणारे लोक कसे असतात ह्याबाबत श्रीसमर्थ म्हणतात की,
आपणास चिमोटा घेतला! तेणें कासावीस झाला! आपणावरून दुसऱयाला! राखत जावे!!
जे दुसऱयास दु:ख करी! ते अपवित्र वैखरी!
आपणास घात करी! कोणीयेके प्रसंगी!! 10/12/24-25
म्हणजे, आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव जसा कासावीस होतो त्यामुळे आपण कोणालाही दु:ख देऊ नये. ज्या बोलण्याने दुसऱयास दु:ख होते, जी वाणी दुसऱयास दु:खी करते ती अपवित्र वाणी होय.
एखाद्या प्रसंगी ही वाणी आपलाच घात करते. व्यवस्थापनातील नकारात्मक शिस्त ही अतिशय समर्पक आणि मार्मिक पद्धतीने ह्यात मांडल्या गेली आहे. असे अनेक कर्मचारी/अधिकारी हे व्यवसायसंस्थेत किंवा उद्योगसमूहात असतात की जे संस्थेने घालून दिलेली नियमांची चौकट मोडून काढतात आणि गैरवर्तन करतात. त्यामुळे इतरांना त्यांच्या वागणुकीचा त्रास होतो. अशाप्रकारे, शिस्त न पाळल्याने ते स्वतःच्याच वागणुकीने स्वतःच घात करून घेतात आणि ह्यामुळे समाजातील ते कार्यरत असलेली संस्था बदनाम होते. नाईलाजास्तव अशा बेजवाबदार कर्मचाऱयावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना संस्थेतून काढून टाकण्यात येते.
शिस्तीचा उद्देश हा संस्थात्मक उद्दिष्टय़े यशस्वीपणे पूर्ण करता यावी म्हणून संस्थेचे नियम, कायदे किंवा पद्धतीला कर्मचाऱयांकडून स्वच्छेने स्वीकृती मिळवणे, कर्मचाऱयांमध्ये तडजोडी करण्याची आणि सहनशीलतेची भावना निर्माण करणे, दिशानिर्देशन करून कर्मचाऱयांवर जबाबदारी सोपवणे, कर्मचाऱयांचे मनोधैर्य वाढवून कार्यक्षमतेत वाढ करणे आणि त्यातून उत्पादकतेत वाढ होऊन उत्पादनमूल्य राखण्यास मदत करणे होय!
म्हणून श्रीसमर्थ मूर्ख लक्षणात म्हणतात की,
जेसे करावे!तेसे भरावे!हे ज्यास नेणीवे!
तो एक मूर्ख!!
ह्यानुसार आपण ज्या कुठल्याही संस्थेत कार्य करतो तेथे आपली वागणूक ही व्यवस्थितच असायला हवी. आपला इतरांशी व्यवहारसुद्धा नीट आणि शुद्ध असायला हवा. आपण वर्तमानकाळात जे बी पेरले आहे तेच भविष्यात आपल्याला फळ देणार आहे ह्याचा विचार करूनच नीट पावले उचलायला हवीत.
व्यवस्थापन शास्त्रात जे कर्मचारी आहेत त्यांनी शिस्त ही पाळायला हवीच पण जर ते शिस्त पाळण्यात कुठे कमी पडले तर मात्र अधिकाऱयांनी त्यांना समजावून घेत त्यांच्याशी समरस होत योग्य मार्गदर्शन करणे अत्यावश्यक असते. परंतु, अधिकारी वर्गाने मात्र बोले तैसा चाले! त्याची वंदावी पावले! ह्या सूत्रानुसारच व्यवसायसंस्थेत कार्यमग्न रहावे. कारण अधिकारी वर्ग जर शिस्तशीर असेल, वक्तशीर असेल तर आणि तरच कर्मचारी वर्ग हा त्यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून नीट वागू शकेल.
माधव किल्लेदार